Health Department appeals : जन्म-मृत्यू व विवाह नोंदणीसंदर्भात आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृतीचे आवाहन

नांदेड| जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी ही कायद्याने अनिवार्य असलेली प्रक्रिया असून, ती निर्धारित वेळेत व नियमांनुसार पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दिनांक ९ जून रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून नोंदणी प्रक्रियेबाबत जनजागृती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विस्तार अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे नोंदणी कर्मचारी, नगरपालिका व नगरपंचायत प्रतिनिधी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा सांख्यिकी अधिकारी एम. जी. डुबकवाड व सांख्यिकी अन्वेषक आर. एन. दुधनी यांनी जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेचे सविस्तर माहिती दिली. यामध्ये आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर तरतुदी व नोंदणीसाठीची कालमर्यादा याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

जन्म नोंदणीसाठी कायद्यानुसार दहा दिवसांची मुदत असून, कुटुंबप्रमुख यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये रुग्णालयाचे डिस्चार्ज प्रमाणपत्र, जन्मदाखला, आईचे ओळखपत्र, अर्जदाराचा अर्ज यांची पडताळणी करूनच नोंदणी करणे आवश्यक आहे. १० दिवसांनंतर व एका वर्षाच्या आत नोंदणीसाठी विशेष अधिकाऱ्याची मान्यता आवश्यक आहे. मृत्यू नोंदणीसाठी नमुना क्र. २ चा वापर होतो. रुग्णालयात मृत्यू झाल्यास फॉर्म ४/४अ भरावा लागतो.


यावेळी विवाह नोंदणीबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रक्रियेबाबत लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असून, आरोग्य विभागातील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीत नोंदणी प्रक्रियेच्या नियमिततेवर भर देत कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असे निर्देशही देण्यात आले.

ग्रामीण भागात जन्म-मृत्यू नोंदणीची जबाबदारी ग्रामपंचायत सचिव, तर शहरी भागात नगरपालिका व नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्यावर असते. तसेच, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी हेही नोंदणी निबंधक म्हणून काम पाहतात.



