Thursday, June 25

Nanded Crime News तलवारीने जीवघेणा हल्ला; भाग्यनगर पोलिसांची झटपट कारवाई, पाच आरोपी अटकेत

नांदेड| तलवार व खंजरच्या साहाय्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ अटक केली असून गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी आणि तीन दुचाकी असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास विराट ढाबा, शिव रोड परिसरात जुन्या वादातून काही जणांनी एका तरुणावर तलवार व खंजरने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यावर, खांद्यावर व पायावर गंभीर जखमा झाल्या. जखमीवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

या घटनेप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३९/२०२६ नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पाच आरोपींना अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी आणि तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैभव कांबळे (२१), राहुल भुसारे (२९), योगेश भुसारे (२७), शुभम नायके (२४) आणि अनंत इंबितदार (१९) यांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेण्यात आला असून आणखी एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अविनाश पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तांबे व गुन्हे शोध पथकाने केली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!