कंधार, सचिन मोरे|| शेती पिकाचे संरक्षण करण्यासाठी व डुकरांचा उपद्रव थांबवण्यासाठी शेतीभोवती तारेचे कुंपण लावून त्यात अवैधरित्या विद्युत प्रवाह सोडल्यामुळे सदरच्या विद्युत तारेस धक्का लागून अमोल अनिल कांबळे वय २३ वर्षे रा.अशोक नगर कंधार या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे कंधार सह मानसपुरी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


घटनेचे वृत्त असे की, अशोक नगर कंधार येथील रहिवासी अमोल अनिल कांबळे वय २३ वर्षे व्यवसाय मजुरी हा दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजताचे सुमारास कामास जातो, असे सांगून घरून गेला, परंतु तो दिनांक ८ ऑगस्ट रोज शनिवार पर्यंत घरी वापस आलाच नाही. त्यामुळे अमोल याचा सर्वत्र शोध घेतला असता दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी शनिवारी १२:०० वाजताचे सुमारास मानसपुरी शिवारामध्ये वैभव व्यंकटराव गोरे यांच्या शेतात अवैधरित्या धुऱ्यावर विद्युत प्रवाह सोडलेल्या तारेच्या कुंपणास मयताचा डावा हात लागून त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निदर्शनास येताच मानसपुरीचे पोलीस पाटील यांनी सदरची घटना मयत अमोल कांबळे यांच्या कुटुंबीयास कळविली. कांबळे कुटुंबीयांना मयताची ओळख पटताच हंबरडा फोडला.


सदरची घटना कंधार पोलिसांना कळतच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन, स्थळ पंचनामा करून, सदरचे प्रेत हे शेवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे आणण्यात आले. मयताची आई वंदनाबाई अनिल कांबळे वय ३५ वर्षे रा.अशोक नगर कंधार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल डीकळे यांच्याकडे दिला आहे.




