Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा

नांदेड | प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वे गाड्या व रेल्वे परिसरात अग्निसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन सर्व प्रवाशांना केले आहे. ज्वलनशील पदार्थ बाळगणे, आग-संबंधित कृती करणे तसेच धूम्रपान करणे हे पूर्णपणे प्रतिबंधित असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.


नांदेड विभागामार्फत सध्या रेल्वे गाड्या व स्थानकांमध्ये ज्वलनशील वस्तूंची वाहतूक, सिगारेट व बिडी ओढणे याविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम रेल्वे संरक्षण दल (RPF) व वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहभागातून राबविली जात असून, प्रवाशांमध्ये जनजागृती करणे व असुरक्षित बाबींना आळा घालणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गाड्या व स्थानकांमध्ये अगरबत्ती लावणे, कापूर जाळणे, दिवे किंवा आग पेटवणे, ज्वलनशील पदार्थ बाळगणे यासारख्या कृतींमुळे मोठ्या दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे अशा कोणत्याही कृतींपासून प्रवाशांनी कठोरपणे दूर राहावे. तसेच, रेल्वे गाड्या व परिसरात सिगारेट, बिडी किंवा कोणत्याही स्वरूपात धूम्रपान करणे हा दंडनीय गुन्हा असून, दोषी आढळल्यास नियमांनुसार दंड व इतर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.


कायदेशीर तरतुदी व शिक्षा रेल्वे अधिनियम 1989 मधील कलम 67, 164 व 165 नुसार रेल्वेमध्ये ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थांची वाहतूक केल्यास ₹1,000 पर्यंत दंड, 3 वर्षांपर्यंत कारावास, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याशिवाय, कलम 167 नुसार रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यासही दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी प्रवाशांना रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे व प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या ज्वलनशील वस्तू बाळगू नयेत, असे आवाहन केले आहे. डब्यांमध्ये आग लावणे किंवा धूम्रपान नियमांचे उल्लंघन करू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
तसेच, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विजय कृष्णा आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त / आरपीएफ श्री. अमित कुमार मिश्रा यांनी प्रवाशांना रेल्वेच्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक बाब आढळल्यास तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना कळविण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे प्रशासनाच्या या सूचनांचे पालन केल्यास प्रवास अधिक सुरक्षित व अपघातमुक्त होईल, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.



