लेखनांदेड

The wounds of the flood and the tears of the river! महापूराच्या जखमा अन् नदीचे अश्रू!

पैसा नको, संपत्ती नको
अंग झाकण्याएवढे कपडे द्या
पाटी नको, दप्तर नको
पोटाला लागेल तेवढी भाकरी द्या
नको मदत मुख्यमंत्री साहेबांची
साहेब जीव वाचवून द्या
साहेब जीव वाचवून द्या…
न्यूज चॅनलवर एका 7 ते 8 वर्षाच्या चिमुकलीची मुलाखत बघितली अन् मन सुन्न झालं. त्या चिमुकीने अश्रू गाळत, हुंदके देत साहेब जीव वाचवून द्या… हेच तिचे वाक्य… ऐकताना मुलाखत घेणार्‍यालाही अश्रू अनावर झाले. त्याचेही मन भरुन आले. त्या चिमुकलीची कशी समजुत काढावी हेही त्याला समजत नव्हतं.

सुंदर गाव, बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा मंजुळ आवाज, शेणामातीनं सारवलेल्या भींती व अंगण, ढाळजात बसलेले आजी- आजोबा, बैलांना घेऊन निघालेले शेतकरी, शेतात स्वतःच्याच तोर्‍यात डोलणारे पीक, कामात व्यस्त असणारी आमची माय- बहीण, शाळेच्या तयारीत असणारे आमचे लाडके चिमुकले अशी दिनचर्या सुरु असताना रात्रीतून अश्रूमय करणारी विदारक परिस्थिती. सकाळी होत्याचं नव्हतं करणारे जलमय चित्र. कुणाच्या शेळ्या- कोंबड्या, कुणाचे जनावरं, कुणाचे धान्य, घर- संसार आमच्याच माय नावाच्या नदीने वाहून नेले. कुणाचे वडील, आजी, आजोबा, बहीण, भाऊ असे अनेक लोक बेपत्ता झाले. कोणती बातमी कधी कानावर येईल या भीतीने अंगावर शहारे आणणारी परिस्थिती निर्माण झाली.

सगळीकडे पाणीच पाणी. महापूर, नदीचे रौद्ररुप यातील पाणी सार्‍या दुनियेला दिसते, पण महापूरात उद्धवस्त झालेल्या लोकांच्या वेदना, डोळ्यातील अश्रू कदाचित त्या नदीबरोबरच वाहून जात असावेत. कारण नदीप्रमाणेच त्या अश्रूंनीही रौद्ररुप धारण केले असावे.
नदी मायचा महिमा गाताना एका कवितेच्या काही ओळी आठवतात –
नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येणे भूमीवर
नदीबाई माय माझी निळे निळे पाणी
मंद लहरीत गाते ममतेची गाणी…
रोज नदीवरुन जाताना याच नदीमायला हात जोडून नतमस्तक होणारे डोके याच मायला प्रश्न विचारतात, का कोपसील माय तुझ्या लेकरांवर? डोळ्यात जोपासणार्‍या स्वप्नांची रांगोळी विस्कळीत करणारी नदीमाय सुद्धा निरुत्तर होऊन अश्रू ढाळत ढाळत पुढे जात असावी.

आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन स्वतःच्या संसाराला फुलवणारे गरीब शेतकरी शासनाच्या सहकार्याने किती उभे राहतील? वीट- माती यांच्या सहाय्याने स्वतःच्या रक्ताचं पाणी करुन घर उभं करणार्‍या शेतकर्‍यांसाठी आभाळ फाटलं, स्वप्नं विरलं, संकटांनी घेरलं, पावसामुळे अश्रू आणि दुःखाचा महापूर आला. बळीराजाचा आक्रोश सरकारपर्यंत कधी पोहोचणार? यांच्या डोळ्यातील अश्रू आटेपर्यंत सरकारलाही जाग येणार नाही की नाही, माहिती नाही. पण या बळीराजाला मदत करणं सरकारच्याही फायद्याची गोष्ट नाही. सगळा मेवा, मलाई खाल्ल्यानंतर पातेल्याच्या तळाशी राहिलेलं करपलेलं जरी पोहोचलं तरी माझा शेतकरी राजा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. कारण असे अस्मानी संकट तो अगदी बालवयापासूनच पाहत त्याचे चटके सहन करत लहानाचा मोठा झाला.

या महापूराच्या जखमांनी तो कोलमडून जरी पडला असला तरी तेवढ्याच नव्या उमेदीनं तो उभं राहण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण त्याच्या असतातच अगदी तोलामोलाच्या शेणामातीने सारवलेल्या भिंती, संसारोपयोगी साहित्य आणि शेतीसाठी लागणारी अवजारे, एवढच त्याचं जग. ना गेल्याची तमा ना मिळाल्याने अभिमानानं जगणारा. अगदी कमी पैशात तोडक्या मोडक्या सोयी सुविधेत जीवनाचा खरा आनंद तोच घेऊ शकतो आणि समाधानाची झोप अगदी तप्त उन्हाळ्यातही झाडाखाली किंवा डोक्यावर पंखा नसतानाही तोच घेऊ शकतो. काय त्याचे ऐश्वर्य? काय त्याच्या मनाचा मोठेपणा? काय त्याची जीवन जगण्याची पद्धत? हेवा वाटावा असंच…

बळीराजाचा आक्रोश सरकारपर्यंत केंव्हा पोहोचणार याची निश्चित वेळ सांगता येणार नाही. पण याच बळीराजाच्या घामानं, कष्टानं पिकविणार्‍या अन्नावर आमचा देश चालतो, आम्ही पोटभर खाऊ शकतो. किमान त्या अन्नविधात्याची सरकारला कीव यावी. महापूर आला अन् सगळं घेऊन गेला.

माझी सरकारला एकच विनंती आहे की, साहेब आपले मोठमोठे अरबो रुपयांचे प्रकल्प सध्यातरी बंद करावेत अन् माझ्या गोरगरीब लोकांना, शेतकर्‍यांना जगण्याची ताकद द्यावी. अहो, देश खूप प्रगती करेल, तुमच्या या महाप्रकल्पाने! पण या प्रगतीचा उपयोग व आनंद घ्यायला ही गोरगरीब जनता व विद्यार्थी तर असावयास हवेत ना? आधी देशातील लोकं मजबूत असतील तरच होणार्‍या प्रगतीचा लाभ होईल अन्यथा या प्रगतीचा काय उपयोग?

एखाद्याच्या शेतात गांजा उगवतो तेंव्हा काही क्षणातच शासन त्या जागेवर पोहोचते, मग आता याच शासनाला महापूराच्या जखमा व अश्रूंचा डोंगर दिसत नसावा काय?
आस्मान नावाचा बाप आमचा
कोपला असा लेकरांवर
धरत्री नावाची आई आमची
रुसली का तिच्या बळांवर?
आई आई म्हणत जीव झाला कोरडा
रडत होता बाप, झाला वेडापिसा
पीक गेलं, घर गेलं, गेले वाहून स्वप्नं
पाहून हाल लेकरांचे आईही झाली सुन्नं
बाबा असू दे तुझी छाया
अन् माझ्या आईचीही माया
म्हणेल चिमुकली पुन्हा नाहीतर
साहेब जीव वाचवून द्या…
साहेब जीव वाचवून द्या…

– रुपाली रमेश बिसने, सहशिक्षिका, जि.प. हायस्कूल वजीरगाव जि. नांदेड मो. 9403957856

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button