CEO Meghna Kavali : स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा सीईओ मेघना कावली

IMG 20260318 184634 CEO Meghna Kavali : स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा सीईओ मेघना कावली

नांदेड | गावांचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत स्वच्छता ही केवळ शासनाच्या योजनांमधून शक्य नसून त्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे. स्वच्छता ही लोकचळवळ बनवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले.

नांदेड येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मेघना कावली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड, नरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, डॉ. प्रवीणकुमार घुले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता शिंदे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, तसेच स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार आदी उपस्थित होते.

मेघना कावली यांनी पुढे सांगितले की, स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी नियमित प्रशिक्षण आवश्यक असून यामुळे कर्मचारी अधिक प्रेरित होऊन प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात मयूरकुमार आंदेलवाड यांनी सांगितले की, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतिम टप्प्यात असून या उपक्रमाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

IMG 20260318 WA0016 scaled CEO Meghna Kavali : स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा सीईओ मेघना कावली

प्रशिक्षणादरम्यान विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अमित राठोड व क्षमता बांधणी तज्ञ चैतन्य तांदूळकर यांनी स्वच्छता कामांची माहिती दिली. डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या लसीकरण व आरोग्याबाबत मार्गदर्शन केले, तर डॉ. सखाराम खुणे यांनी जनावरांच्या मलमूत्र व वैरण व्यवस्थापनावर माहिती दिली.

याशिवाय पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई यांनी जलप्रदूषण व स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील ग्रामपंचायत अधिकारी एकनाथ कदम यांनी गावातील स्वच्छता उपक्रमांचा अनुभव मांडला.

या कार्यशाळेस तालुका स्तरावरील कनिष्ठ अभियंते, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील अधिकारी, तज्ञ व सल्लागार तसेच तालुका गट समन्वयक आणि समूह समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले, तर आभार सुशील मानवतकर यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top