नांदेड l राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यात किनवट येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय तर नांदेड, तामसा, मुक्रमाबाद व इस्लापूर या चार ठिकाणी अपर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरात ११ अपर जिल्हाधिकारी कार्यालय तर ६९ अपर तहसील कार्यालयांची निर्मिती करण्याच्या निर्णयावर मोहर लावण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय तर नांदेड (ता. नांदेड), तामसा (ता. हदगाव), मुक्रमाबाद (ता. मुखेड) व इस्लापूर (ता. किनवट) येथे अपर तहसील कार्यालयाचाही समावेश आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला बळकटी मिळणार असून, नागरिकांची कामे सुलभ होणार आहेत. या निर्णयाबद्दल खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे यांचे आभार मानले आहेत.

