
“जिथे भाव आहे, ताल आहे, राग आहे अशी माझी भारतमाता” आज “15 ऑगस्ट” आपल्या भारत मातेला प्रथम आपण वंदन करूयात. आपल्या जीवनामध्ये पाच माता खुप महत्त्वाच्या आहेत. 1) भारतमाता 2) भुमाता 3) गोमाता 4) गंगा माता 5) जन्म देणारी आपली आई या पाच मातांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. ते आपण कसेहि फेडू शकत नाही. या माता खुप खुप महान आहेत. यांचे वर्णन आणि स्तुती करण्यास हो आपण साधारण माणसे कमी पडतो या मातांना आपण वंदन आणि कोटी कोटी प्रणाम करूयात.


आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खुप आनंदाचा, हर्षाचा, उल्हासाचा मोठा सण आहे “15 ऑगस्ट” हा दिवस आपल्या राष्ट्राचा भाग्योदय आणि समाजाला अभय प्राप्त करून देणारा दिवस आहे. कितीतरी मानवपुष्प हसत हसत समर्पित झाले आपल्या या भारत भुमीला स्वतंत्र करण्यासाठी आणि म्हणूनच “15 ऑगस्ट” ची पहाट हि स्वतंत्रता दिवसाची पहाट म्हणून उदयास आली आपली भारत माता गुलामगिरीतून स्वतंत्र झाली. तो हा महान, पुण्यवान, पावन, पवित्र दिवस “15 ऑगस्ट 1947” युगेन युगे या दिवसाचा इतिहास असाच सांगितला जाणार आहे. अशा या महान, पावन दिवसाला आपण वंदन करूयात. वारंवार बंदन करूयात.

ज्या इमारतीवर, भवनावर आपला तिरंगा फडकवता येत नव्हता त्या इमारतीवर आणि भवनावर आपण आपला तिरंगा फडकवला तो खुप गौरवाने फडकवला. हा राष्ट्रध्वज आपले यश, मान, सन्मान, स्वतंत्रता आदर्श यांच प्रतिक आहे आणि हे संदेशवाहनच प्रतिक देखील आहे. आपल्या या तिरंग्यातील धर्मचक्र गतिमान आणि उन्नतीच प्रतिक मानल जात.


“15 ऑगस्ट” हा दिवस आपल्या भारताच्या इतिहासात आणि पूर्ण जगाच्या इतिहासात महत्त्वाचा, मानाचा दिवस ठरला गेला आहे. या महान दिनाला आपण प्रणाम करूयात. आपल्या भारत देशाकडे अस एक शस्त्र आहे त्या शस्त्राच्या बलावर भारत स्वतंत्र झाला ते म्हणजे अहिंसा “15 ऑगस्ट” हा दिवस किती, किती पुण्याचा आनंदाचा आहे हे आपल्या शब्दात वर्णन करू शकत नाही कारण या दिवसापासून एक नविन राष्ट्रीय पर्व चक्र चालु झाले आहे. या पवित्र दिवसाला मनापासून वंदन.

हा दिवस आज आपण खुप आनंदाने साजरा करत आहोत. कारण, भारतमातेच्या खुप पुत्रांनी बलिदान दिले आहे. ते घरी परत केव्हाच आले नाहीत. आपले प्राण देऊन स्वतंत्रतेचा नवीन दिप ज्या अमर जवानांनी प्रज्वलीत केला अशा सर्व वीर पुत्रांना, आपण वारंवार कोटि कोटि प्रणाम करूयात.
शेवटी माझ्या भारत मातेसाठी एकच म्हणावेसे वाटते
सुंदर माझी भारत माता, अति सुंदर माझी भारत माता,
जिच्या पवित्र पावन चरणी लोटांगण घेते सरी दुनिया,
आमुचा अभिमान, गर्व आमुची भारत माता,
देवांनाही प्रिय अशी आमुची भारत माता,
धन्य झालो आम्ही जन्मास आलो या भुमी,
साऱ्या विश्वामध्ये आहे माझ्या भारत मातेची किर्ती,
अशा या महान अद्भुत पवित्र भारतमातेला कोटि कोटि प्रणाम आणि वंदन आणि ही काहि शब्द सुमने आपण अर्पण करूयात. भारत माता की जय !
लेखिका….वर्षा संजय जमदाडे, नांदेड.



