Vadar community : घाम गाळून रस्ते,धरणे,इमारती बांधणाऱ्या वडार समाजाला न्याय द्या – वडार समाजाची मागणी

नांदेड| दगड फोडून मातीकाम करून दळणवळणाचे रस्ते टोलेजंग प्रशासकीय इमारती,सिंचन धरणे आणि गडकिल्ल्यांसह पर्यटन स्थळे बांधणारा वडार समाज न्यायापासून वंचित आहे. या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊन न्याय द्या अशी मागणी वडार समाजाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न दगड फोडो धरणे आंदोलन करून केली आहे.


रानावनाने दगड फोडून डोंगरदऱ्या कोरत मातीकाम करून दळणवळणाची रस्ते, मोठमोठी सिंचनाची धरणे आणि टोलेजंग प्रशासकीय इमारती बांधणारा वडार समाज आज वडार समाज नेते डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात प्रा. साहेबराव बेळे, नागेश मेटकर, विनोद दंडलवाड, मारुती मिरेवाड यांच्या संयोजनातून आज सकल आदिवासी वडार जमात नांदेड च्या बॅनरखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड,हिंगोली,परभणी, जालना येथील हजारो वडार युवक व प्रतिनिधी अर्धनग्न होऊन प्रतीकात्मक दगडफोडो आंदोलन केले.

या आंदोलनात वडार युवकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात मुख्य मागणी अनुसूचित जमाती (एस.टी.बी) आरक्षण वडार समाजाला लागू करा यासह वडार समाजास जिल्हा निहाय एक वस्तीगृह, 500 ब्रास पर्यंत रॉयल्टी माफ, जात प्रमाणपत्रास 1961 चा पुरावा मागू नये, वडाराना गायरान पट्टे व घरकुले मंजूर करा आदी इतर अनेक स्थानिक मागण्याचा समावेश आहे.


या आंदोलनात डॉ. रॅपनवाड, बेळेसह ओबीसी नेते बालाजी ईबितदार, अड.सुरेंद्र घोडजकर, किशन रॅपनवाड, बालाजी मानकरी, बालाजी मेटकर, किशन चिंचोळकर, विनोद दंडलवाड, नागेश मेटकर, हनुमंत हळदेकर, सुभाष मोरे, डॉ कुऱ्हाडे, बाळा गुंजाळे अनिल पवार,प्रल्हाद मोरे,आदींसह अनेकांनी मनोगत मांडले.वडार समाजाला आरक्षणासह न्याय न दिल्यास मुंबईला हातोडी मोर्चा काढू असा इशारा यावेळी वडार नेत्यांनी दिला. पाच तास चाललेल्या दगडफोडो धरणे आंदोलनानंतर डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात 21 जणांच्या प्रतिनिधी मंडळाने निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.




