हिमायतनगर, अनिल मादसवार| दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर ही गाडी सायंकाळी ७ वाजता नांदेडहून सुटणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ही गाडी तब्बल पाच तास उशिरा, रात्री ११ वाजता निघाली. परिणामी गाडी हिमायतनगर रेल्वे स्थानक येथे रात्री २ वाजता पोहोचली.

या विलंबामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना मध्यरात्रीपर्यंत थांबावे लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कधी तासभर, कधी दोन तास तर कधी पाच तास ही गाडी उशिरा धावत असल्याने प्रवाशांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर हिमायतनगर येथील वार्ड क्रमांक १७ चे नगरसेवक सुभाष पोतन्ना बलपेलवाड यांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली. यावेळी अब्दुल सलाम, मिर्झा नुही बेग, आत्मराम माने, ऋतिक अक्कलवाड यांच्यासह अनेक प्रवासी उपस्थित होते.



प्रवाशांनी रेल्वे विभागाच्या “लेट लतीफ” कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत, गाड्या वेळेवर सोडाव्यात व पुन्हा अशी गैरसोय होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

वारंवार होणाऱ्या विलंबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जनतेचा विश्वास परत मिळवावा, अशी जनहितार्थ मागणी होत आहे.

