The road Isshu : पैनगंगा नदी ते डोल्हारी रस्त्याची झाली अत्यंत दयनीय अवस्था; बससेवा बंद

ढाणकी, हिमायतनगर| विदर्भ – मराठवाडा सीमेला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर हिमायतनगर जवळील पूल आणि रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदाराने पलायन केल्याने नागरिक, शेतकरी, वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याकडे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी लक्ष देऊन अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे.

हिमायतनगर शहराकडून ढाणकी मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या हिमायतनगर ते सिरपल्ली पर्यंत रस्त्यासाठी मागील चार वर्षांपूर्वी निधी उपलब्ध झाला होता. या रस्ता कामाचे ठेकेदार औरंगाबाद येथील सिद्दीकी याना देण्यात आले. त्यांनी रस्त्याचे काम करण्यात अंत्यंत कुचराई केली तसेच संत गती अवलंबवित महिनो महिने काम बंद ठेऊन नागरिकांना वेठीस धरले होते. दरम्यान नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी या रस्त्याचा प्रश्न तारांकित केला. त्यामुळे कामाला कशीबशी सुरुवात झाली. मात्र संबंधित ठेकेदारने बांधकाम विभागाशी हातमिळवणी करून पळसपूर – डोल्हारी – सिरपल्ली पर्यंत रस्त्याचे काम थातुर माथूर व अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले आहे. तर हिमायतनगर शहरानजीक रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन पलायन केले आहे. जे काम झाले त्या डांबरीकरण रस्त्याला महिना देखील झाला नाहीतर तर माणूसनपूर्व पावसात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

विदर्भ – मराठवाडा सीमेला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, खड्डेमय आणि चिखलमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने नागरीकातून कमालीचा संताप व्यक्त केल्या जात आहे. खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकीस्वार पडून आणि वाहने स्लिप होऊन जखमी झाले आहेत. पैनगंगा नदी ते डोल्हारी हा अडीच किलोमीटर रस्ता आणि पैनगंगा नदीपावरील पूल कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीने या रस्त्याला तालुक्यातील हद्दीतूनच वगळले की काय..? असे संताप जनक वक्तव्य नागरिक, वाहनधारक बोलून दाखवत आहेत.

पावसाळ्यात मोठा पाऊस होताच पुलावरून पाणी जाऊन हा मार्ग अनेकदा बंद पडतो आहे. आतातर पावसाळा सुरु झाला नाही मात्र अवकाळी पावसाने रस्त्यावर चिखल निर्माण झाला असून, उमरखेड आगाराकडून येणारी एसटीबस बंद झाली आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील नागरिकांना १५ किलोमीटर दूरचा फेरा मारून ये – जा करावी लागत आहे. हि बाब लक्षात घेता हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी लक्ष देऊन पैनगंगा नदीला जोडणारा डोल्हारी पर्यंतचा अडीच किमीचा रस्ता करावा आणि नदीवरील पुलाची उंची वाढवावी. तसेच हिमायतनगर शहरानजीक राहिलेल्या अर्धवट रस्त्यासह येथील नडव्याच्या पुलाचे काम पूर्ण करण्याची संबंधित ठेकेदाराला तंबी द्यावी अशी मागणी केली जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button