“बाबांच्या सान्निध्यातून… आता श्रीनगरच्या कुशीत!”

काल रात्री सर्वांना सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तय्यार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यामुळे सकाळी निवांत उठावे असे ठरविले होते. पण बालताल बेस कॅम्प मधील सतत सुरु असलेल्या अनाउन्समेन्ट च्या आवाजाने सकाळी 7 च्या सुमारास जाग आली.

बालटालच्या थंड हवेमध्ये सर्व यात्रेकरू उत्साहाने जागे झालेले होते . शिवदर्शनानंतर आता श्रीनगरकडे प्रवास करायचा होता.प्रातविधी आटोपून झाल्यानंतर परत एकदा सर्व टेन्ट मध्ये जाऊन सगळ्यांच्या प्रकृती चौकशी केली.कालचा 28 किमीचा खडतर प्रवास केल्यामुळे अंगदुखी सारख्या किरकोळ तक्रारी होत्या.तरीदेखील रिस्क नको म्हणून कोणाला दवाखान्यात यायचे आहे म्हणून विचारले. सात जणांना घेऊन गेट बाहेर असलेल्या शासकीय रुग्णालयात गेलो. तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले हे रुग्णालय अतिशय प्रशस्त व स्वच्छ होते. डॉक्टरांनी आस्थेवाईक पणे तपासून औषधी दिल्या. काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याचे सांगितले.


अन्नदान :सर्व श्रेष्ठ दान
लुधियानाचे महादेव लंगर, शिवशंभू लंगर आणि अनेक सेवाभावी संस्थांनी प्रेमाने सजवलेली अन्नछत्रं टेंटमध्ये गूंजत होती, इडली-सांबार, पोहे, उपमा, ब्रेड पकोडे, पेठे, हलवा, मॅगी या सारखे असंख्य पदार्थ नाश्ता मध्ये उपलब्ध होते.काही लंगर मध्ये तर जेवण तय्यार होते. – तंदूर रोटी, अळू भाजी, मुगदाळ वरणभात, पराठे, जिलबी, खीर…!एकंदरित, भक्तीमधला रस इथे रसनालाही लाभत होता! हजारो लोक अन्न प्रसाद ग्रहण करत होते.वाढणारे स्वयंसेवक तितक्याच आग्रहाने बोलवत होते. एक गोष्ट मात्र खुप आवडली खाल्यानंतर उष्टी ताटे जिथे ठेवली त्या ठिकाणी एक स्वयंसेवक अतिशय दक्षतेने कोणालाही उष्टे टाकू देत नव्हता.प्रत्येक लंगर दिवसाचा खर्च लाखो रुपयाचा असला तरी अन्नाचा एक कण देखील वाया जाऊ दिला जात नव्हता. शेकडो लंगर मध्ये येथे प्रत्येक राज्याचे लंगर होते.महाराष्ट्र चे यात्रेकरू मोठ्या प्रमाणात असतात पण महाराष्ट्राचा एकही लंगर दिसला नाही याचे आश्चर्य वाटते.

अविस्मरणीय लग्नाचा वाढदिवस!
आज आमच्या सोबतच्या सारिका व ऍड.रविंद्र केंद्रे या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस होता. आम्ही त्यांचं पुन्हा एकदा विधीवत लग्न लावलं, “आज मेरी यार की शादी है ”च्या तालावर वरात, “बहारो फुल बरसाओ” च्या सुरात वधू वरांचे आगमन, अक्षता, अंतरपाठ, पाच मंगलाष्टका, वरमाला, “ बाबूल की दुवांये लेती जा ” च्या सुरात विदाई.सारिकाताईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. भटजी – मनोज जोशी, मामे – सुभाष वानोळे आणि दुलाजी सूर्यवंशी. काश्मिरी लोकही या विवाहसोहळ्याचे साक्षीदार झाले.अमरनाथ च्या पायथ्याशी झालेला हा आगलावेगळा विवाह सोहळा आम्ही आयुष्यात विसरू शकणार नाही असे केंद्रे दाम्पत्यांसह अनेकांनी सांगितले.
पुन्हा सुरू झाला प्रवास
बम बम भोले च्या जयघोषात 10.30 वाजता आम्ही बेस कॅम्प सोडला. टेन्टपासून पार्किंगपर्यंत जाण्यासाठी प्रति बॅग ₹25 प्रमाणे हमाली ठरवून पिट्टू घेतले. शेकडो वाहनाच्या गर्दीत देखील आमच्या प्रशस्त व नवीन गाड्या लगेच ओळखू आल्या.बसेस च्या AC चालू करून ड्रायव्हर तयारच होते , सामान ठेवून पुन्हा एकदा “बम बम भोले!” चा निनाद करत आम्ही श्रीनगरच्या दिशेने निघालो.सोनमर्ग टनेल सुरु झाला तेव्हा पासून “जय भोले ” च्या घोषणा मी सुरु केल्या ते तब्बल साडे सहा किलोमीटर थांबल्या नाहीत. बोगदा संपल्यानंतर सर्वांनी टाळयांच्या कडकडात केला. दुसऱ्या बस मध्ये रामेश्वर वाघमारे यांनी समोसा कचोरी हा गेम घेतला.त्यामध्ये विजयी ठरलेल्या शार्दूल वडजकर याने पाचशे रुपयाचे बक्षीस पटकावले.जणू आठवणींचा खजिना साठवण्यासाठी प्रत्येक क्षण जपला जात होता.दुपारचे जेवण पूर्वी वर्षी आमच्या सोबत आलेले नांदेड चे प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्या तर्फे होते.
श्रीनगरमध्ये रंगली ‘कश्मीर दर्शनाची’ सुरुवात
श्रीनगरला पोहोचल्यानंतर,प्रसिद्ध शालिमार गार्डन पाहायला गेलो. शालीमार बागेत असे काहीतरी आहे जे लगेचच मनाला भिडले. त्यात निशात बागेइतके थर नव्हते, पण त्यात सर्वात तेजस्वी फुले होती. फुलांच्या बेडमध्ये फुलेच नव्हती, तर लॉनमध्येही छोटी फुले विखुरलेली होती. रंगीबेरंगी फुले मनमोहक होती. प्रत्येक फुलझाडे व्यवस्थित जतन केलेली होती. कमालीची स्वच्छता होती. जुन्या दहा रुपयाच्या नोट वर शालिमार गार्डन चा फोटो छापलेला होता. जोडप्यांनी काश्मिरी पेहरावात फोटो काढत वातावरण रंगवलं.
१६१६ मध्ये सम्राट जहांगीरने आपल्या पत्नी नूरजहाँसाठी शालीमार बाग बांधली. शालीमार हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ “प्रेमाचा देव” आहे. सुमारे ५३९ मीटर बाय १८२ मीटर क्षेत्रफळ असलेले शालीमार बाग “प्रेमाची बाग” म्हणूनही ओळखले जाते.शालीमार मुघल गार्डनमध्ये चार टेरेस आहेत, जे एकाच्या वर आहेत.
राजा जहांगीर आणि त्याची पत्नी नूरजहां आणि संपूर्ण जहांगीरच्या दरबारात उन्हाळा शालीमार बागेत घालवायचे, जे त्यांचे शाही उन्हाळी निवासस्थान होते. मुघलांव्यतिरिक्त इतर अनेक शासकांनीही वेगवेगळ्या काळात शालीमारमध्ये बदल केले. शीख साम्राज्याचे महाराजा रणजित सिंह यांनी त्यांच्या युरोपियन पाहुण्यांसाठी शालीमारमध्ये संगमरवरी अतिथीगृह बांधले. जम्मू आणि काश्मीरचे राजपूत कुळातील शेवटचे शासक महाराजा हरि सिंह यांनी शालीमारला विद्युतीकरण केले. सर्व शासकांनी शालीमारला अनेक वेगवेगळी नावे दिली परंतु शालीमार हे नाव सर्वांमध्ये खूप लोकप्रिय होते जे आजही कायम आहे.दल लेक परिसरात मोठ्या गाड्यांना बंदी असल्याने, 15 टाटा सुमो करून आम्ही शिकारा स्टँड ७ वर पोहोचलो.
दल लेक, स्वप्नवत हाऊसबोटचा अनुभव
तेथे माझा ट्रॅव्हल एजंट सज्जाद भाई हजर होता. नेहमीप्रमाणे ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार केला. माझा अनुभव सांगतो, प्रारंभीचा सन्मान सेवा सुधारतो! प्रत्येक जोडप्यासाठी एक स्वतंत्र बेडरूम असलेली हाऊसबोट मी आधीच आरक्षित केली होती, कोणतीही अडचण आली नाही. फ्रेश झाल्या नंतर एका शिकारा मध्ये चार जणांना घेऊन शिकारा राईडसाठी सर्वजण जलप्रवासाला निघाले.एक तासाच्या हा शिकारा राईड बहुतेकांनी पहिल्यांदाच अनुभलेला असल्यामुळे ते प्रचंड खुश झाले.
हॉटेल नाही, हृदयातून दिलं गेलेलं जेवण
गतवर्षीच्या अमरनाथ यात्रेकरू रेखाताई भताने यांच्यातर्फे प्रत्येक हाऊसबोटमध्ये स्नेहभोजनाची खास व्यवस्था होती. चविष्ट भोजन, रम्य हवा, पाण्यावर तरंगणारी घरं, आणि थकलेल्या यात्रेकरूंसाठी पूर्ण विश्रांती! (कर्मश:)

