Farmers in Nanded district are happy in some places and worried in others due to rain नांदेड,अनिल मादसवार| जिल्ह्यात काल बुधवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे रान शिवारात कोवळी सोयाबीनचे पिके वाऱ्यावर डोलू लागली आहेत. या पिकांना पाहून शेतकरी आनंदात असले तरी काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन अश्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देऊन हातभार लावावा अशी मागणी केली जात आहे.

मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला होता, दरम्यान काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करूनही पिके उगवली नाहीत. त्यामुळे देगलूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार कृषी विभागाकडे केली होती. आता तेथील शेतकरी दुबार पेरणीच्या तयारीत असून, अद्यापही बोगस बियाणे विकणार्यावर कार्यवाही झाली नाही.


तर उगवण झालेली कोवळी सोयाबीनची पिके पावसाच्या प्रतीक्षेत होती. दरम्यान ऊन सावलीचा खेळ चालत असल्याने सोयाबीनवर गोगलगाईंनी शिरकाव केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. यामुळे कोवळी पिकांची पाने कुर्तडल्या जात असल्याने शेतकरी अडचणीत आला होता, असे असताना कुंभकर्णी झोपेतील कृषी अधिकारी केवळ मर्जीतील व आपला ऐकणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन फोटो काढून आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत असं दाखविण्याचा प्रयत्न करून काळजीवाहूंपणा दाखविला आहे.


दरम्यान पिके वाढत असताना बुधवारी सायनाकली दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे झालेल्या पावसाने मात्र मृतावस्थेत आलेल्या सोयाबीनच्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. पिकं वाऱ्यावर डोलताना दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यंदा वेळेत पेरणी केली असून, या पिकांमध्ये चांगली वाढ होत आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. मात्र दुसरीकडे, काही शेतकऱ्यांच्या शेतात बियाणं उगवलेच नाहीत किंवा उगम कमी प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या चिंतेने ग्रासले आहे. त्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे.

या स्थितीत बियाण्याचा खर्च, मजुरी, वेळ वाया जाऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ लक्ष देऊन अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, बियाण्यांची आणि आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. अश्या शेतकऱ्यांना शासनाने मोफत बियाणे देऊन हातभार लावावा अशी मागणी केली जात आहे.
