नांदेड l योगविद्या ही मानवी जीवनात शांतता, संयम, शिस्त व शारीरिक आणि मानसिक मजबूती देणारी आहे. योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देण आहे. योग संस्कृतीचा जागतिक पातळीवर प्रसार करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंहाची भूमिका असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज येथे व्यक्त केले.

जागतिक योगदिनाचे औचित्य साधत भाजपच्या नांदेड महानगर शाखेच्या वतीने व शारदा कंस्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन, लोकमत व नमस्ते नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुद्वारा परिसरातील श्री ग्रंथसाहिब हॉल यात्रीनिवास येथे आयोजित केलेल्या योग शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी आ.श्रीजयाताई चव्हाण, भाजपाचे महानराध्यक्ष तथा संयोजक माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बी.आर.कदम, भाजप नेते डॉ. अंकुश देवसरकर, माजी महापौर मोहिनी येवनकर, संयोजक ॲड.दिलीप ठाकूर, सहसंयोजक विजय गंभीरे, बालाजी शेळगावकर, माजी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, प्रवक्ते संतोष पांडागळे, डॉ.शहाजी उमरेकर, सौ. मृणालताई राजूरकर आदींची उपस्थिती होती.


यावेळी बोलतांना ना. बोर्डीकर पुढे म्हणाल्या की, योगामुळे शरीर सशक्त होते. मन प्रसन्न राहते. मनुष्याची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकांनी स्वतःच्या शरीरासाठी सकाळचा एक तास राखीव ठेवला पाहिजे व याच काळात आपण प्रत्येकाने योग आणि प्राणायाम केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
आ.श्रीजया चव्हाण यांनी आपल्या भाषणातून योगाचे महत्व सांगितले. प्रत्येकानेच योग आणि प्राणायाम याला आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनविले पाहिजे, असे सांगतानाच योग शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आ. श्रीजया चव्हाण यांनी महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांचे अभिनंदन केले.

संयोजक अमरनाथ राजूरकर यांनी योग संस्कृतीचा आपल्या भाषणातून इतिहास सांगताना 2014 मध्ये युनो या जागतिक संघटनेने 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी देशाचे पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी यांनी सिंहाची भूमिका वठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जगाला खऱ्या अर्थाने योगाची ओळख झाली असेही ते म्हणाले.
या योग शिबिरात 500 पेक्षा अधिक योग शिक्षक, विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् व महाराष्ट्र गीताने झाली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

