नांदेड l केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियान २.०चा तालुकास्तरीय शुभारंभ आज आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते पंचायत समिती, किनवट येथे उत्साहात पार पडला.

किनवट तालुका हा आकांक्षित तालुका कार्यक्रमात समाविष्ट असून, मागील वर्षी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानाच्या पुढील टप्प्याच्या रूपाने हे अभियान राबविले जात आहे. २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात आरोग्य-पोषण, शिक्षण तसेच कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रांतील एकूण ६ महत्त्वाचे निर्देशक १०० टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


यावेळी आमदार भिमरावजी केराम यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहन केले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभाग व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.



उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी अभियानातील निर्देशांक पूर्ण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत आरोग्य, महिला व बालविकास आणि ग्रामपंचायत विभागांच्या समन्वयातून हे उद्दिष्ट सहज साध्य होऊ शकते, असे सांगितले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन आकांक्षित तालुका कार्यक्रमाचे समन्वयक पांडुरंग मामीडवार यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी निवृत्ती मूकनर यांनी मानले.

या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पशुवैद्यकीय कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

