Dr. Rajendra Naikwade ; प्राचीन भारतीय अद्वैत तत्वज्ञान हाच समरसतेचा विचार – डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांचे प्रतिपादन
नांदेड| “समरसता हे जीवनमूल्य आहे. भारतीयांचे अद्वैतचिंतन हे समरसतेचे अधिष्ठान आहे. प्राचीन भारतीय तत्वज्ञान हाच समरसतेचा विचार आहे”, असे प्रतिपादन डॉ. प्रा. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले. विसाव्या समरसता साहित्य संमेलनाच्या दुसर्या दिवशी रविवारी, दि. तीन ऑगस्ट रोजी बीज भाषण करताना ते बोलत होते.


येथील भक्ती लॉन्स येथे हे संमेलन चालू आहे. या प्रसंगी कै. गंगाधरदादा पवार व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नामदेव चं. कांबळे, समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदापुरे तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष खा. डॉ. अजित गोपछडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. नव्वदोत्तरी साहित्य आणि समरसता हा यंदाच्या संमेलनाचा विषय आहे.

सुमारे पाऊण तासाच्या बीज भाषणात प्रा. नाईकवाडे यांनी प्राचीन भारतीय तत्वज्ञानापासून ते नव्वदोत्तरी साहित्यापर्यंतचा समर्पकपणे आढावा घेतला. समरसता हे जीवनमूल्य आहे. तसेच ते वाङमयमूल्यदेखील आहे, ही बाब आता मराठी साहित्यात मान्य झालेली आहे.


अगदी वेद परंपरा, संत साहित्य आणि संघ विचारातून समरसतेचा विचार आलेला आहे, असे प्रा. नाईकवाडे यांनी सांगितले. सर्व महान व्यक्तींच्या विचारांचा पाया म्हणजे बंधुता, समरसता आहे. हे प्रा. नाईकवाडे यांनी अनेक संत, महंत आणि समाजसुधारकांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. संतांच्या मांदियाळीने हा समरसतेचा विचार सांगितला आहे.

समता आणि समानता या शब्दांची पोपटपंची करणे आणि प्रत्यक्षात वेगळे जीवन जगणे हे चुकीचे आहे. हिंदू समाजातील जातीयता, विषमता ही एक समस्या आहे. पण हा दुःखाचा प्रवाह स्वीकारल्याशिवाय समरसतेला पर्याय नाही, असेही प्रा. नाईकवाडे यांनी ठामपणे सांगितले.
हे विष टाकून, समाजात समरसतेची मूक क्रांती घडवण्याचे कार्य गेल्या शंभर वर्षात संघाच्या लाखो कार्यकर्त्यांनी केले आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. नव्वदोत्तरी मराठी साहित्याचा आढावा घेताना, प्रा. नाईकवाडे म्हणाले की, आंबेडकरी, ग्रामीण, स्त्रीकेंद्री, आदिवासी आणि महानगरी साहित्य असे प्रवाह प्रामुख्याने निर्माण झाले आहेत.
या सर्व साहित्यांच्या राजकीय प्रेरणा वेगवेगळया असल्या तरी समरसतेची भावना एकच आहे. बीज भाषणाच्या या सत्राचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. नरेंद्र घरत यांनी केले. यावेळी साहित्य रसिक आणि राज्यातून आलेल्या समरसता मंचाच्या प्रतिनिधींनी भक्ती लॉन्सचे सभागृह खचाखच भरले होते



