MLA Baburao Kadam Kohlikar : आता शासनाच्या योजनांचा लाभ थेट जनतेला मिळणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

हिमायतनगर, अनिल मादसवार| शासनाच्या विविध लाभकारी योजना आता थेट जनतेपर्यंत पोहोचतील, असे प्रतिपादन हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले. ते शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमाचे उदघाटन झाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.



यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी श्री कांबळे, तहसीलदार पल्लवी टेमकर, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार कोहळीकर म्हणाले की, शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता, त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी विविध स्तरांवर समन्वय ठेवत कार्यवाही सुरू आहे. शेतकरी, महिला, युवक, वृद्ध, अपंग तसेच मागासवर्गीय घटकांना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. प्रशासनाने गतिमान पद्धतीने काम करून जनतेला एका छताखाली सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले.


यावेळी त्यांनी सांगितले कि, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या माध्यमातून नागरिकांना एका ठिकाणी सर्व योजनांची माहिती व लाभ मिळेल, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रशासनाने यासाठी आवश्यक पावले उचलली असून, शेतकरी, महिला, विद्यार्थी, आणि गरजू घटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी यावेळी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष नागरिक उपस्थित होते.



जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ सोपा व जलद मिळावा, यासाठी प्रशासन गतिमान होऊन काम करतेय – तहसीलदार पल्लवी टेमकर
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व सेवा “एकाच छताखाली” मिळाव्यात या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जनतेला विविध विभागांचे लाभ सहज, सोप्या पद्धतीने, वेळेत व पारदर्शकतेने मिळावेत यासाठी प्रशासनाकडून विशेष गतीने व समन्वयाने काम केले जात आहे.


तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिबीर अत्यंत महत्त्वाचे आहे. महसूल विभागासह आरोग्य, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, जलसंधारण आदी विभागांनी या शिबिरात सहभाग घेतला आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या व अडचणींसाठी वेगवेगळ्या कार्यालयात भटकण्याची गरज नाही. एकाच ठिकाणी सर्व सेवा आणि माहिती मिळणार असल्यामुळे लोकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत. शिबीराच्या आयोजनामुळे लोकसंपर्क वाढून प्रशासनावर विश्वास दृढ होईल आणि जनहिताचे कार्य अधिक परिणामकारक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



