dust and gravel : अर्धवट रस्त्यावर धूळ-खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनधारक त्रस्त
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले असून, त्यामुळे तहसील कार्यालय, भोकर, नांदेड शहर तसेच ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, उडणाऱ्या धुळीमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.


या खड्डेमय रस्त्यावरून वाहन जाताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, अनेक वेळा दुचाकीस्वार अडखळून पडण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात या मार्गावर चिखलाचे साम्राज्य तर उन्हाळ्यात धुळीमुळे डोळे, श्वसनाचे आजार आणि वाहनांचे नुकसान होत असल्याने नागरिक, व्यापारी, शेतकरी व प्रवासी वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे.

विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवाची महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा भरत असून, याच राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट परिसरात भव्य शंकर पट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात हजारो भाविक, यात्रेकरू आणि बाहेरील गावांतील नागरिक शहरात दाखल होणार आहेत. मात्र, सध्याच्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला असून, भाविकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.



त्यामुळे संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून किमान तात्पुरती डागडुजी, खड्डे बुजवणे व धूळ नियंत्रणाची उपाययोजना करावी, जेणेकरून यात्रेकरू, नागरिक, शेतकरी व वाहनधारकांना दिलासा मिळेल, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून पुढे येऊ लागली आहे.

“यात्रेपूर्वीही प्रशासनाने दखल घेतली नाही तर नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशाराही संतप्त नागरिकांकडून दिला जात आहे.



