
मुंबई| मुंबईसह महाराष्ट्रात सध्या दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे असे नमूद करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील एकूण लोकसंख्या, जन्मदर, मृत्युदर आणि क्षेत्रफळ या गोष्टींचा विचार करून हा प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवारी विधानसभेत या विषयावरील चर्चेत सहभागी होताना केली आहे.


माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख या विषयावरील चर्चेत सहभागी होताना म्हणाले की, दफनभूमी तसेच स्मशानभूमी उपलब्धतेची मुंबई येथे खूपच गंभीर समस्या आहे, त्याचप्रमाणे राज्यात गावागावातही अलीकडच्या काळात या संदर्भातील अडचणी निर्माण होत आहेत, बहुतांश ठिकाणी शासनाने दफनभूमी आणि स्मशानभूमीची व्यवस्था केली आहे, काही ठिकाणी खाजगी स्वरूपाची ही व्यवस्था आहे परंतु, वेगवेगळ्या समाजाची वाढलेली लोकसंख्या, वाढलेल्या वस्त्या यामुळे अनेक ठिकाणी दफनभूमी आणि स्मशानभूमी संदर्भात मागणी येत आहे.

प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेला अनेक ठिकाणी या संदर्भाने बिकट अशा समस्येला सामोरे जावे लागत आहे, सदरील समस्या सोडवण्यासाठी शासनाने, या बाबतीत व्यापक सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. सर्वेक्षणा अंती एकूण लोकसंख्या, जन्मदर मृत्युदर या गोष्टीचा सारासार विचार करून, यासंदर्भात एक कालबद्ध धोरण आखण्यात यावे, या धोरणाची अंमलबजावणी करून, दफनभूमी आणि स्मशानभूमीची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली. एकूणच या चर्चेला उत्तर देताना तीन महिन्यात सर्वेक्षण करून ही समस्या सोडवण्यासाठी शासन धोरण राबवेल असे आश्वासन शासनाच्या वतीने असे उद्योग
मंत्री उदय सामंत यांनी दिले.





