Unseasonal rains washed away : अवकाळी पावसाने बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास हिरावला
नांदेड| गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली. यात राज्यातील अनेक भागातील शेती पिकांना मोठा तडाखा बसल्याचे पहावयास मिळाले. नांदेड तालुक्यातील रहाटी, सोमेश्वर आदी परिसरातील शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला भुईमुग पिकाचा घास या अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे.


कर्जबाजारी झालेल्या शेतकर्याचे आधीच कंबरडे मोडलेले असतांना अवकाळी पावसाने मात्र त्यावर कहर केला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना तात्काळ शासनाकडून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी. या मागणीसाठी रहाटी येथील शेतकरी उद्धव बोकारे, आनंदा बोकारे, काशिनाथ बोकारे, संतोष बोकारे यांच्यासह इतर शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मराठवाड्यात वादळीवार्यासह बरसणार्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या वादळी वार्यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. तर वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रहाटी, सोमेश्वर भागात सतत बरसणार्या या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान केले आहे. नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या भुईमुग पिकाचे शेकडो हेक्टरवरील पिक नेस्तनाबुत झाले आहे. तर जनावरांच्या वैरणाचाही प्रश्न मोठा गंभीर बनल्याने या भागातील पूर्णतः कोलमडून गेला आहे. वारंवार बळीराजावर नैसर्गिक संकट कोसळण्याची मालिका गेल्या सात वर्षांपासून सुरुच आहे.


शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाईची मदत ही तोकडी पडत असून शेतकर्यांना भरीव मदत देवून पुन्हा उभारी द्यावी अशी मागणी निवेदनकर्त्या शेतकर्यांनी केली आहे. भुईमुग पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना तात्काळ शासनाकडून 50 हजाराची नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी रहाटी आणि सोमेश्वर भागातील शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केलेल्या निवेदनात केली आहे. तात्काळ मदत न मिळाल्यास या भागातील शेतकर्यांना आंदोलनाचा पत्करावा लागेल, असेही निवेदनात नमुद केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर आनंदा पुंडलिकराव बोकारे, उद्धव माधवराव बोकारे, संतोष बाबुराव बोकारे, काशिनाथ आनंदा बोकारे यांच्यासह इतर शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.




