Municipal corporetion ; नवीन कौठा येथील दलित वस्तीतील पाणी प्रश्न सोडवून नागरी सुविधा द्याव्यात ; अन्यथा महापालिकेवर घागर मोर्चा – सुनील अनंतवार -NNL

नांदेड। मागील बारा वर्षांपासून नवीन कौठा येथील पाणी प्रश्न सोडविण्यात यावा व तेथे नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा व अनेक तक्रारी महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात येत आहेत. परंतु मागण्या पूर्ण होत नाहीत ही खुपच गंभीर बाब आहे.


महापालिका हद्दीत आपण आहोत का नाही? असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे.अमृत योजनेसाठी आलेले करोडो रुपये व करापोटी वसुली झालेली रक्कम जाते कुठे असा प्रश्न नवीन कौठा येथील नागरिक विचारत आहेत.या भागात अजून नळ पोहचले नाहीत. कचरा व्यवस्थापन नाही,नाली नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून साथीचे रोग पसरण्याची भीती आहे.

विशष म्हणजे ही परिस्थिती नवीन कौठा येथील दलित वस्ती मधील आहे.विष्णुपुरी जलाशय पूर्णता भरलेला असताना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी वानवा आहे.पाणी प्रश्न तातडीने सोडवावा,पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट थांबवावी,रस्ते,नाल्या,ड्रेनेज,सीसी रोड आदी नागरी सुविधा महापालिकेने पुरवाव्यात असे लेखी निवेदन राष्ट्रीय कलाल,गौड समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे प्रदेश अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील अनंतवार यांनी आयुक्त यांना ८ ऑक्टोबर रोजी दिले असून निवेदनावर जळबाजी सोनकांबळे,सिद्धार्थ कांबळे,राहुल हैबते,सचिन कांबळे,मनोज जोगदंड, निलेश जोंधळे,अंबादास सिरसाठ,राघोजी हनवते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी तातडीने मागण्या सोडवून नवीन कौठा येथील दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा ऐन सनासुदीत महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा लेखी इशारा सुनील अनंतवार व इतर नागरिकांनी दिला आहे.




