नांदेड / किनवट (प्रतिनिधी) जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील प्रसिद्ध हरीण पठारावर दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या हरीणाचा दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेला तब्बल दोन दिवस उलटूनही वन विभागाचे अधिकारी–कर्मचारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले नसल्याने वनप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


मृत हरीणाचा पंचनामा व शवविच्छेदन न झाल्याने मृतदेहाची विटंबना होत असून, वन विभागाच्या उदासीनतेमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लाखो रुपयांचा पगार घेणारे कर्तव्यदक्ष कर्मचारी घटनास्थळी न पोहोचणे ही शोकांतिका नव्हे तर प्रशासनाची अपयशाची कबुली असल्याची प्रतिक्रिया वन्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.


गेल्या पंधरा दिवसांत पांगरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात हरीण ठार झाले होते. त्याचबरोबर परिसरात दोन ते तीन हरीणांचे संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बिबट्याचा वाढता धुमाकूळ व हरणांचे मृत्यू हे नित्याचे झाले असतानाही वन विभागाकडून कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.


दुसरीकडे, मुरझळा येथे विनापरवाना १७ सागवान वृक्षांची तोड झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी, पुरावे नष्ट झाल्यावर वन विभागाने पंचनामा केल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून वन्यजीव मृत्यूकडे दुर्लक्ष आणि इतर बाबींमध्ये उशिरा दाखवलेली तत्परता यातील विसंगती अधोरेखित होत आहे.

मराठवाड्यात नामांकित असलेल्या हरीण पठारावर सफारी पार्क, मनोरे, अत्याधुनिक कॅमेरे व कर्मचारी नियुक्त असतानाही सातत्याने घडणाऱ्या घटनांना जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार का? अशी मागणी वनप्रेमी मंडळींकडून होत आहे. या गंभीर बाबीकडे नांदेडचे उपवनसंरक्षक लक्ष देतील का? की वन्यप्राण्यांचे मृत्यू असेच दुर्लक्षित राहणार, असा सवाल आता जनसामान्यातून तीव्रतेने विचारला जात आहे.


