Governor C. P. Radhakrishnan : भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई| देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते.

आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले.

आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

या काळामध्ये लोकतंत्र सेनानींनी दिलेल्या लढ्यामुळे लोकशाही आजही टिकून आहे. या काळात अनुशासनाच्या नावाखाली लोकशाही पायदळी तुडविण्यात आली. प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप आणण्यात आली. लोकशाहीवरील अशा संकटकाळातही ज्या देशातील लोकशाही व्यवस्था टिकून राहते, त्याच देशातील लोकशाही पुढे बळकट होते. लोकशाहीला कुणीही कधीही संपवू शकत नाही, हे लोकतंत्र सेनानींनी त्या काळात लढा देवून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

आणीबाणी विरोधात लोकतंत्र सेनानींनी केलेला संघर्ष प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशात २५ जून, १९७५ हा काळा दिवस होता. या दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली. अशा या काळ्या दिवसाला आज ५० वर्ष पूर्ण झाली. लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी या आणीबाणीचा उपयोग करण्यात आला. हा काळ नागरिकांना व्यवस्थेचे गुलाम करणारा होता, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणीबाणीचा निषेध व्यक्त केला.

आणीबाणी विरोधात लोकतंत्र सेनानींनी केलेला संघर्ष हा प्रेरणादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संविधानाची हत्या करीत नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर नियंत्रण आणले गेले. भारताचे संविधान अखंड आहे, जे कुणीही बदलू शकत नाही. देश हा संविधानाने चालत राहणार आहे. आणीबाणीच्या संघर्षकाळात लढा देणाऱ्या सेनानींचे कार्य कधीही विसरले जाणार नाही. अशा संघर्ष केलेल्या लोकतंत्र सेनानींच्या पाठीशी शासन उभे आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, लोकतंत्र सेनानी उपस्थित होते. प्रास्ताविक राज्यपाल यांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले. सुरूवातीला आणीबाणी काळातील मान्यवरांनी चित्रमय प्रदर्शनाची पाहणी केली. कार्यक्रमादरम्यान मुंबई शहर जिल्ह्यातील श्रीपाद गंगाधर मुसळे, अनिल रामनाथ लोटलीकर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील मेधा सोमय्या, उदय माधवराव धर्माधिकारी, राजेंद्र यादव या सेनानींचा सत्कार करण्यात आला. आभार मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button