CA Dr. Praveen Patil ; नैसर्गिक व मूल्याधिष्ठित जीवनासाठी संस्कार शिबिरांची गरज – सीए डॉ. प्रवीण पाटील

नैसर्गिक व पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यासाठी तसेच मूल्याधिष्ठित जीवन जगण्यासाठी संस्कार शिबिरे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी केले. नवज्योत फाउंडेशनच्या विसाव्या संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


डॉ. पाटील पुढे म्हणाले की, समाजातील जातिव्यवस्थेच्या जळमटातून बाहेर पडून माणुसकी जपणे ही काळाची गरज आहे. आदर्श नागरिक घडवण्यासाठी संस्कारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजगतेने वागणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.


पेट्रोलच्या वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सायकलचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नेदरलँडसारख्या प्रगत देशातील उदाहरण देत त्यांनी आरोग्यदायी व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला.
नवज्योत फाउंडेशन गेल्या वीस वर्षांपासून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक सद्भावना, आदर्श नागरिकत्व आणि शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या संस्कार शिबिराच्या माध्यमातून युवकांमध्ये सकारात्मक विचार आणि मूल्यांची जपणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.



यावेळी गेल्या वीस वर्षांच्या संस्कार शिबिराचा आढावा घेणाऱ्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. शिबिराच्या पहिल्याच दिवशी व्यक्तिमत्व विकास या विषयावर श्री. संतोष देवराये यांनी मार्गदर्शन केले. तर अनुजा डोईफोडे यांनी सामाजिक सद्भावना व राष्ट्रप्रेम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष नौनिहालसिंग जागीरदार, अॅड. प्रदीप नागपूरकर, अलीभाई पैंजवानी, अॅड. चिरंजीलाल दगड्या, आयटीआय प्राचार्य गुरुबचन सिंग, प्रा.. यशपाल भिंगे, श्री. राहुल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


