HomeBlogDr. Saanvi Jethwani ; तृतीयपंथी समुदायासाठी ‘बीज भांडवल योजना’ला मंत्रिमंडळ मान्यता —...

Dr. Saanvi Jethwani ; तृतीयपंथी समुदायासाठी ‘बीज भांडवल योजना’ला मंत्रिमंडळ मान्यता — डॉ. सान्वी जेठवाणी यांचे स्वागत

तृतीयपंथी समुदायाच्या विकासासाठी व मुख्य प्रवाहात आणले जावे याकरिता तृतीयपंथी घटकातील व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध करून देऊन त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी रुपये दोन लाखांपर्यंत चेक कर्ज अनुज्ञ करणारी बीज भांडवल योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रतिवर्षी ९ कोटी इतक्या खर्चास २२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

सदर बीज भांडवल योजनेअंतर्गत तृतीयपंथी व्यक्तींना रुपये २५,००० पर्यंत लघु कर्ज, ५०,००० पर्यंत मध्यम कर्ज तसेच २ लाखांपर्यंत दीर्घ कर्जाचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या २१ लघुउद्योगांसाठी तसेच तत्सम इतर लघुव्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून कौशल्य प्रशिक्षण व टूलकिट सहाय्य देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हिस्सा ५%, ४५% शासन अनुदान व ५०% राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभार्थ्याने राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जाची परतफेड विहित कालावधीत केल्यास व्याज रकमेत ३% रिबेट (सूट) देण्यात येणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या जामीनदार किंवा तारणाची आवश्यकता राहणार नाही.

या योजनेसाठी तृतीयपंथी लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यात किमान १० वर्षे वास्तव केल्याचे अधिवास प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता माननीय सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय धोरण समिती, आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती तसेच तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या समन्वयाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्या गठित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. सान्वी जेठवाणी सह-उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळ, यांनी सांगितले की, “माझ्या कार्यकाळात तृतीयपंथी समाजासाठी अशी पहिली स्व-रोजगाराभिमुख योजना जाहीर होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या योजनेमुळे तृतीयपंथी समाजाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे.”

डॉ. जेठवाणी यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी तृतीयपंथी समाजाच्या विकासासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या योजनेद्वारे तृतीयपंथी बांधवांना कमी व्याजदरात आर्थिक मदत, प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन उपलब्ध होणार असून रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. राज्यातील तृतीयपंथी व्यक्तींच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी ही योजना ऐतिहासिक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

डॉ. जेठवाणी यांनी राज्यातील तृतीयपंथी समाजाला आवाहन केले की, या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्षमपणे सहभागी व्हावे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments