
नांदेड | नांदेड–वाघाळा महानगरपालिका निवडणूक २०२६ चे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट केले आहे. एकूण ८१ जागांच्या या महापालिकेत भारतीय जनता पार्टीने ४५ जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. या ऐतिहासिक विजयासह भाजपने महापालिकेच्या सत्तेवर एकहाती कब्जा केला आहे.


निवडणूक निकालानुसार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने नांदेड शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये प्रभावी कामगिरी करत मतदारांचा विश्वास संपादन केला. प्रभाग क्रमांक ४, ५, ६, ९, १०, १६, १७, १९ व २० यांसारख्या महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपच्या सर्व किंवा बहुसंख्य उमेदवारांनी विजय मिळवला. अनेक प्रभागांमध्ये भाजपने सुफडा साफ करत विरोधकांना संधीच दिली नाही हे स्पष्ट झाले.


काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत मर्यादित यश मिळाले असून, पक्षाच्या वाट्याला एकूण ११ जागा आल्या आहेत. प्रभाग क्रमांक २, ८, १२ व १८ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला असला तरी पक्ष अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.



ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये आपली पकड कायम राखली असून पक्षाने एकूण १४ जागांवर विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ११, १२, १३ तसेच वार्ड क्रमांक १४ मध्ये AIMIM च्या उमेदवारांनी बाजी मारली, त्यामुळे या भागांतील पक्षाचा जनाधार अजूनही भक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वंचित बहुजन आघाडीनेही काही प्रभागांमध्ये प्रभाव दाखवत एकूण ५ जागा मिळवल्या असून विशेषतः प्रभाग क्रमांक २ व ७ मध्ये पक्षाच्या उमेदवारांनी विजय नोंदवला आहे.

शिवसेनेला या निवडणुकीत केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि एलसीपीला प्रत्येकी एक-एक जागा मिळाली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी ठरला आहे.
🔢 पक्षनिहाय विजयी जागा (एकूण ८१)
- भाजपा : ४५
- काँग्रेस : ११
- AIMIM : १४
- वंचित बहुजन आघाडी : ५
- शिवसेना : ४
- NCP : १
- एलसीपी : १
- अपक्ष : १
या निकालांमुळे नांदेड–वाघाळा महानगरपालिकेत भाजपची मजबूत व स्थिर सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर व उपमहापौर पदावरही भाजपचा दावा भक्कम मानला जात असून, निकालानंतर भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जल्लोष केला. या निवडणूक निकालांनी नांदेडच्या स्थानिक राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
खा. अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया
मी नांदेडकराचा मनापासून आभारी आहे… हे यश नांदेडकरांच्या विश्वासाचं… मोदीजी, देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं आणि भाजपचे आमचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांच्या मेहनतीचं असून, भाजपला स्पष्ट बहुमत नांदेडकरांचा कौल विकासाला, सकारात्मकतेला आहे. विरोधकांकडे मुद्देच नव्हते… फक्त शिव्याशाप, अपप्रचार… मतदारांना नकारात्मकता आवडत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून, विरोधक भुईसपाट करून माझ्यावरील प्रेम व सहकार्य कायम ठेवल्याबद्दल मी नांदेडकरांचा ऋणी आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.



