हिमायतनगर, अनिल मादसवार| कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतः पासून केली पाहिजे, इतिहास साक्षी आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांच्या विचारांचे वारसदार बना, तरच खऱ्या अर्थानं सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केल्याचे फलीत होईल. आज घडीला जिल्हा परीषदेच्या शाळा सुधारणे अतिशय गरजेचे असून गाव पातळीवरील शाळा सुधारल्यास भविष्य काळात समाज व देश आपोआप सुधारेल असा संदेश हभप. निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर यांनी केला.

हिमायतनगर ( वाढोणा ) येथील श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात दिनांक ४ मंगळवारी हभप. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचा भव्य किर्तन सोहळा पार पडला. आपल्या किर्तन सेवेत हभप.इंदूरीकर म्हणाले की, धर्मावर संकट आहे, धर्म संरक्षणासाठी आपण युवकांनी पुढे यावे. देव देश सेवा महत्वाची असून शेतकऱ्यांची पोरं सैन्यात आहे. शेतकरी व सैन्यच हे खर्या अर्थानं देशसेवा करीत आहेत. मोबाईल च्या अति वापरामुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे. ॴनलाईन गेम, रमी व शेअर बाजार या मध्ये तरूण वर्ग गुरफटला आहे.


दारु जुगार इत्यादींसह मोबाईलच्या व्यसनातून तरुणांनी बाहेर येऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करावा. तरच शिवजयंती उत्सव साजरी केल्याचे फलीत होईल. असे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित किर्तनात हभप.निवृती महाराज देशमुख इंदूरीकर यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीराचंद श्रीश्रीमाळ आदींसह अनेक मानण्यावर मंडळी, शिवजयंती मंडळाचे कार्यकर्ते व प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.



