नांदेड| ‘शरीराच्या जखमा दिसतात, त्यावर मलमपट्टी करता येते; पण मनाच्या जखमा अदृश्य असतात. त्या जखमांना शब्दांचे स्पर्श हवे असतात. व्यक्त होणे म्हणजेच मनाचे उपचार, आणि त्या उपचारांसाठी काव्य हेच सर्वांत प्रभावी माध्यम आहे, असे हृदयस्पर्शी प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केले. स्त्रीच्या वेदना केवळ शारीरिक नसतात, त्या सामाजिक, मानसिक आणि आर्थिक स्तरावरही असतात, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले.

त्या नांदेड येथे आयोजित कवयित्री नीलम नांदेडकर यांच्या ‘आनंदी चांदणे’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. कार्यक्रमास सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. दि. भा.जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी तथा साहित्यिक, सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ. जीवन पिंपळवाडकर, तसेच साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. सभागृहात शब्दांचा आणि संवेदनांचा साक्षात उत्सव अवतरला होता.

डॉ. वृषाली किन्हाळकर पुढे म्हणाल्या, ‘मी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना अनेक महिलांच्या आयुष्याशी जवळून परिचित झाले. त्यांच्या वेदना केवळ प्रसूतीकक्षापुरत्या मर्यादित नसतात. त्या वेदना दारिद्र्याच्या, कौटुंबिक दबावाच्या, सामाजिक अन्यायाच्या आणि आर्थिक असुरक्षिततेच्या असतात. अनेक महिलांना स्वतःचा आवाज दाबून जगावे लागते. त्यांना रडायलाही मोकळीक नसते. अशा वेळी कविता त्यांच्या अंतर्मनाची सखी बनते. आनंदी चांदणे या काव्यसंग्रहातून कवयित्री नीलम नांदेडकर आतून व्यक्त झालेली दिसून येते.


त्यांनी नमूद केले की, मानसिक आरोग्याकडे समाज अजूनही उपेक्षेने पाहतो. ‘स्त्रीच्या वेदनांकडे ‘तिला सवयच असते’ या दृष्टिकोनातून पाहिले जाते, ही मोठी शोकांतिका आहे. पण जेव्हा ती स्त्री लेखणी हातात घेते, तेव्हा तिच्या वेदना शब्दांत रूपांतरित होतात आणि ते शब्दच तिच्या मुक्तीचे दार उघडतात, असे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात नीलम नांदेडकर म्हणाल्या, ‘मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून लिखाण करते आहे. आयुष्याने अनेक परीक्षा घेतल्या; पण मी वेदनांच्या राखेतून आनंदाचे चांदणे वेचले. कविता माझ्यासाठी आत्मसंवादाची साधना आहे. त्यांनी काव्यसंग्रहाच्या पाठराखणीबद्दल ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांचे आभार मानले.
डॉ. दि. भा. जोशी यांनी मनोविकारांविषयी समाजातील संकोचावर भाष्य करताना सांगितले, ‘मनातील जळमटे काढून टाकण्यासाठी धैर्य लागते. कृतज्ञता व्यक्त करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कविता ही मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी औषधासारखी आहे.
डॉ. जीवन पिंपळवाडकर यांनी अभिव्यक्तीच्या विविधतेवर प्रकाश टाकत म्हटले, ‘अभिव्यक्तीची चौकट ठरवता येत नाही. प्रत्येकाच्या शब्दांना स्वतःची लय, वेदना आणि आशा असते. त्या वैविध्यातच साहित्याची खरी ताकद आहे. निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या या आनंदी चांदणे कविता संग्रहास सर्व विषयांना स्पर्श करुन हा कविता संग्रह सर्वसमायोचित केला आहे. याबद्दल तिचे अभिनंदन केले.
भक्ती नांदेडे व स्वप्ना पाटोळे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवदास हमंद आणि गोविंद मुंडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रसाद नांदेडकर यांनी मानले. निवडक कवितांच्या वाचनाने सभागृहात प्रसन्न, चिंतनशील भावदशा निर्माण झाली होती. शब्दांच्या चांदण्यांनी उजळलेली ही संध्याकाळ उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ दरवळत राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या सोहळ्याने एकच संदेश अधोरेखित केला
मनाच्या वेदनांना गप्प ठेवू नका; त्यांना शब्द द्या. कारण शब्दांतच उपचार दडलेले असतात, आणि काव्यातच माणूस स्वतःला पुन्हा शोधतो. या माध्यमातून आपण जगा दुसर्याला जगू द्या, हा संदेश या कविता संग्रहातून अधोरेखित होतो. यावेळी सौ.झेलम महाजन, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, डॉ.वझरकर, व्यंकटेश चौधरी, अरुण मुदगलकर, सौ.अनघा कुरुंभट्टे, सौ.सविता कट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

