Swami Sarang Chaitanyaji Maharaj : हिरण्यकशिपूचा वध आणि भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतानी घेतला नृसिंह अवतार – हभप.भागवताचार्य परमपूज्य स्वामी सारंग चैतन्यजी महाराज

हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रीमद भागवत महापुराण कथेत तिसऱ्या दिवशी विशेषतः सप्तम स्कंधामध्ये हिरण्यकशिपूचा वध आणि नृसिंह अवताराचे अत्यंत प्रभावी आणि भक्तिरसपूर्ण वर्णन हभप. भागवताचार्य परमपूज्य विदर्भ केशव स्वामी सारंग चौतन्यजी महाराजांनी सांगितले आहे. हे संपूर्ण प्रसंग भक्त प्रल्हादाच्या भक्ती, हिरण्यकशिपूच्या अहंकार आणि भगवंताच्या अद्वितीय लीलेचे प्रतीक मानले जाते असल्याचे ते म्हणाले.



उपस्थित भाविक भक्तांना भागवत कथा सांगताना स्वामीजी म्हणले कि, हिरण्यकशिपू हा एक बलाढ्य असुरराजा होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवले होते. “माझा मृत्यू न होवो, ना मनुष्याने, ना प्राण्याने, ना दिवसा, ना रात्री, ना घरात, ना बाहेर, ना शस्त्राने, ना अस्त्राने, ना आकाशात, ना पृथ्वीवर, ना पाताळात.” हा वर मिळाल्यानंतर त्याचा अहंकार अनियंत्रित झाला. त्याने स्वतःला देव मानायला सुरुवात केली. सर्वत्र “मीच परमेश्वर आहे” असा हुकूम लावला.


हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा अत्यंत शांत, विनम्र आणि भगवंत विष्णूचा निस्सीम भक्त होता. वडिलांच्या असह्य विरोधातही तो रोज (विष्णू) नारायणाचे नामस्मरण करायचा. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विष देण्याचा, उंच इमारतीवरून खाली फेकण्याचा, हत्तींच्या पायाखाली टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवान (विष्णू) नारायणाने प्रल्हादाचे प्रत्येक वेळी रक्षण केले. एक दिवस हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारले “तुझा नारायण आहे कुठे?” प्रल्हादाणे सांगितले माझा (विष्णू) नारायण “सर्वत्र आहे. या स्तंभात सुद्धा आहे हे ऐकून हिरण्यकशिपू क्रोधीत झाला आणि लोखंडी गदाद्वारे समोरच्या स्तंभावर प्रहार केला. तेवढ्यात त्या स्तंभातून प्रचंड गर्जना करत भगवंत नृसिंह रूपात प्रकट झाले.



अर्धे सिंह आणि अर्धे मानव, ना दिवस ना रात्र, ना घरात ना बाहेर, ना शस्त्र ना अस्त्र, ना आकाशात ना भूमीवर या साऱ्या अटीनुसार भगवंतांनी हिरण्यकशिपूच्या मांडीवर आडवे पडून वध केला. आणि भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. हिरण्यकशिपूच्या वधानंतर देखील भगवान नृसिंहाचा कोप शांत होत नव्हता. त्यावेळी भक्त प्रल्हाद पुढे येऊन भक्तिभावाने भगवंताला वंदन करतो. त्याच्या स्पर्शानेच नृसिंह भगवान शांत होऊन प्रल्हादावर प्रसन्न झाले.

याचा अर्थ असा कि, भक्ती, श्रद्धा आणि सत्याच्या शक्तीवर भगवंत नेहमीच कृपा करतात. अहंकार कितीही मोठा असो, तो नाश पावतोच. भगवंत आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी कोणतेही रूप घेऊ शकतात हे भगवान नृसिंह अवताराचे कारण आहे असेही स्वामींजी म्हणाले. यावेळी भगवंताच्या झांकी रूपातील दर्शनाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.



