हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक १३ मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त महिलांनी व नागरिकांनी नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. घडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांना दाहीदिशा भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

वारंवार मागणी करूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत महिलांनी नगरपंचायतीसमोर रिकाम्या घागरींसह आंदोलन केले आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो; मात्र पाण्यासाठी दिवसभर फिरावे लागत असल्याने मजुरीचे काम बुडते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन मतदान घेतले गेले; परंतु आता आमच्या ज्वलंत समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. नगराध्यक्ष व नगरसेवक बॅनरबाजी आणि सत्कार समारंभात व्यस्त असून, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वेळ देत नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.


“आमची पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवली नाही, तर आम्ही मुलांबाळांसह नगरपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडू,” असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर नब्बीसाब मौला, केराबाई वाघमारे, वंदनाबाई गोरेकर, शेख शबाना बेगम, संगिताबाई धडेकर, अ. हफिज शेख बाबू, मनिषा धडेकर, रूक्माबाई धडेकर, रामेश्वर गोरेकर, शेख असिफ, सविता गायकवाड, नागेश धडेकर, प्रविण वाघमारे, श्रीकांत वाघमारे, अजित पाशा, कोमल धडेकर, सुनिताबाई बनसोडे, मनिषा गायकवाड, अ. मुख्तद्दिन, शांताबाई धडेकर, पार्वताबाई गोरेकर, शेख अफसाना शेख अहमद आदी अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या तीव्र पाणीटंचाईकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

