शिवणी, भोजराज देशमुख | किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवणी गावाने देशसेवेसाठी दोन शूर जवान दिल्याने गावाचा नावलौकिक तालुका व जिल्हास्तरावर झळकला आहे. शिवणी येथील साईनाथ बेलयवार यांची सीमा सुरक्षा दलात (BSF) तर अजय धुमाळे यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन्ही जवानांनी आपले कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून पहिल्यांदाच जन्मगावी आगमन केल्याने, नवयुवक मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण शिवणी गाव देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेले होते.

शिवणीसारख्या दुर्गम भागात प्राथमिक शिक्षण घेत, जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमांच्या जोरावर साईनाथ बेलयवार व अजय धुमाळे यांनी हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे शेतकरी मल्लेश बेलयवार यांचे एकुलते एक पुत्र असलेले साईनाथ बेलयवार यांना देशसेवेकरिता पाठविण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या कुटुंबाने घेतला. या निर्णयाबद्दल बेलयवार कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


तर दुसरीकडे, रेडिओ दुरुस्तीचे काम करून उपजीविका करणारे पंडित धुमाळे यांनी अत्यंत कष्टाने आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले. आर्थिक अडचणी असूनही दोन्ही कुटुंबांनी मुलांना योग्य संस्कार व शिक्षण दिले आणि त्यातूनच हे उज्ज्वल यश साकार झाले आहे. त्यामुळे हे दोन्ही जवान परिसरातील विद्यार्थ्यांसाठी व सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पार पडलेल्या या सत्कार समारंभास गावातील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी जवानांचे अभिनंदन करत, तरुण पिढीने देशसेवा, शिस्त व जबाबदारीची प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवणी येथील नवयुवक मंडळाने घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून, हा सोहळा केवळ सत्काराचा नव्हे तर देशप्रेम, कृतज्ञता आणि प्रेरणेचा उत्सव ठरल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

