Wednesday, May 13

Bear Attack Farmers : दयाळ धानोरा शिवारात अस्वलाचा थरार; सात शेतकऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू

इस्लापूर| किनवट तालुक्यातील दऱ्याळ धानोरा शिवारात बुधवारी सकाळी भीषण घटना घडली. शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर अचानक अस्वलाने हल्ला चढवला. या हल्ल्यात दत्ता जाधव (वय ५०) यांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. इतर काहींवर किरकोळ उपचार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पिकांना पाणी देण्यासाठी व जनावरांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसमोर झुडपातून अचानक अस्वल बाहेर आले. काही कळण्याच्या आत त्याने सलग हल्ले केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शिवारात एकच खळबळ उडाली.

आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. जखमींना तत्काळ किनवट उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.
घटनेनंतर वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अस्वलाचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली असून नागरिकांनी शिवारात एकट्याने न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व जखमींना योग्य उपचार देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागाने अस्वलाला पकडून सुरक्षित स्थळी हलवावे, अशीही मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!