हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी उन्हाळी ज्वारी, गहू आदी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.

विशेषतः पवना येथील शेतकरी अवधुत परमेश्वर तमलवाड यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या शेतातील ज्वारी व गव्हाचे पीक आडवे पडून संपूर्ण पिकाची नासाडी झाली आहे. कापणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक वाऱ्याच्या तडाख्यात कोसळल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.


सदर घटनेमुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून, शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.


दरम्यान, विजांच्या कडकडाटामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


