नांदेड| आरोग्य विमा क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीविरोधात गंभीर आरोप उघड झाले आहेत. कंपनीने दिलेली आश्वासने पाळली नाहीत आणि परतावा प्रक्रिया विलंबित करून ग्राहकांची आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

गायत्री स्वामी या विद्यार्थिनीला 104 अंश फॅरेनहाइट ताप आल्यामुळे तिला शिवाजीनगर, नांदेड येथील एका बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हे रुग्णालय स्टार हेल्थच्या मान्यताप्राप्त यादीत नसल्याने, कंपनीच्या प्रतिनिधींनी बिलाचा परतावा 8 दिवसांत मिळेल असे आश्वासन दिले. परंतु अनेक दिवस उलटूनही परतावा मिळालेला नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे, कंपनीच्या प्रतिनिधींनी असेही सांगितले की, “ताप आल्यावर रुग्णाला दवाखान्यात ऍडमिट करण्याची गरज नाही.” सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ स्वामी यांनी सांगितले की, “मागील 4 वर्षांपासून मी सतत पॉलिसीचे हप्ते भरत आहे. एकही क्लेम दाखल केला नव्हता. हा पहिला क्लेम असूनही कंपनी तो देण्यास टाळाटाळ करत आहे. खोटे आश्वासने देऊन एजंट आणि कंपनी सामान्य लोकांची लुबाडणूक करत आहेत. मग अशा कंपनीची पॉलिसी नागरिकांनी का खरेदी करावी?”


IRDAI चे स्पष्ट नियम कॅशलेस सुविधा न मिळाल्यास, परतावा अर्ज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांत देणे बंधनकारक. कारणाशिवाय परतावा विलंबित करणे हा ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अन्यायकारक व्यवहार आहे. वैजनाथ स्वामी यांनी पुढे सांगितले की, या अन्यायाविरोधात मोठी मोहीम छेडण्यात येईल आणि ग्राहकांना त्यांच्या हक्कासाठी लढा देण्यास प्रवृत्त केले जाईल. तसेच, पुढील कारवाईसाठी IRDAI तसेच ग्राहक तक्रार मंच आणि न्यायालयात हे प्रकरण दाखल करून न्याय मिळवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांनीही अशा कंपन्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


