
नांदेड| जिल्ह्यात चालू असलेले अवैध धंद्यासंदर्भाने नेहमीच खडे फोडले जात आहेत, असे असताना देखील कुठे उघड तर कुठे चोरी छुपे सर्वच अवैद्य धंदे सुरु आहेत. हा मुद्दा नांदेड येथे शनिवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत गाजल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांची मंगळवार दि.३० रोजी बैठक घेत येत्या १५ ऑगस्ट पुर्वी जिल्हयात सूरु असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करा. अश्या कडक सूचना दिल्या आहेत. अन्यथा गाठ माझ्याशी असल्याची तंबी देखील त्यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.


मागील आठवड्यात २५ जूलै रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा पदभार शहाजी उमाप यांनी स्वीकारल्यानंतर त्यांना दुसर्याच दिवशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सामोरे जावे लागले होते. या बैठकीत अवैध धंद्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असून, अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत हे काम संबंधित ठाण्याचे पोलीस अधिकारी यांच्या आशिर्वादाने चालू असल्याचा आरोप कांही सदस्यांनी करत अदिवासी क्षेत्रातील किनवटच्या पोलीस निरीक्षकावर आरोप केला होता. या बाबत पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी या गंभीर विषयाची दखल घेतली.

नांदेड परिक्षेत्राचे नव्याने रुजू झालेले विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांना या संदर्भात चौकशी करण्याच्या सुचना केल्यानंतर पुर्वीचा नांदेड जिल्हयाचा इतिहास माहित असलेले श्री उमाप यांनी जिल्ह्यात सूरु असलेल्या अवैध धंदे या संदर्भाने मंगळवार दि. ३० रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील ठाणे अमलदारांची बैठक बोलावण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांना बैठकीसाठी पाचारण केले होते.


या बैठकीत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी ठाणे प्रमुखांना १५ आगस्ट पर्यंत अवैध धंदे बंद करा अन्यथा गाठ माझ्याशी असल्याची तंबी दिली असल्याचे सांगण्यात आले. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी अवैध धंद्या बाबतीत दिलेल्या आदेशाने गुन्हेगारीला समर्थन देणार्या पोलीस अधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत. असे असले तरी अजूनही काही ठाण्याअंतर्गत सर्वच प्रकारचे अवैद्य धंदे सुरुच असून, यावर स्थानिक पोलिसांची मेहेरनजर असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.




