नांदेड| जिल्ह्यातील नायगाव तालुक्यासह राज्यातील शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मेटाकुटीला आलेला आहे. सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण ठरले आहे. राज्यकर्ते जातीपाती व धर्मामध्ये सामान्य जनतेचे भांडणे लावून शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व शेतकरी पुत्रांनी सरकारचे लक्ष आपल्या मागण्याकडे द्यावे यासाठी पक्षविरहित,पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र येऊन शेतकरी- शेतमजूर हक्क समितीच्या वतीने दि.२२ ऑगस्ट गुरुवारी सकाळी १० वाजता हेडगेवार चौकातून नायगाव तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढणार आहेत.
या मोर्चामध्ये पुढील मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत १) ई -पीक पाहणी नोंद रद्द करून सरसकट कापूस -सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे ५ हजार रुपये देण्यात यावे. २) खरीप हंगाम २०२३ काळातील पिक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. ३) तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात यावे. ४) किसान सन्मान योजना ७/१२ ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू करावी. ५) शेतकऱ्यांना कोणतेही कर्ज देताना सिबील अट रद्द करावी. ६) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला खर्चाच्या दीडपट भाव देण्यात यावा. ६) वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा आणि वन्यप्राण्यामुळे शेतीचे जे नुकसान झालेले आहे ही भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी.
हा शेतकऱ्याचा आसूड मोर्चाची जनजागृती करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे मांजरमकर, किसान ब्रिगेडचे विभाग अध्यक्ष डॉ. दत्ता मोरे देगांवकर ,शेतकरी पुत्र श्याम वडजे, युवा नेतृत्व गजानन चव्हाण, छावा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांनी तालुक्यातील गावा -गावात जाऊन मोर्चाला येण्याचे आवाहन केले. या मोर्चाला येत असताना सर्व शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा अर्ज, भाकर -भाजी व पाण्याची बॉटल सोबत घेऊन यावी असे सांगण्यात आले आहे.