नांदेड | भारतीय संस्कृती मध्ये व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा पर्वास अनन्यसाधारण असे महत्व आहे. आपल्यावर संस्कार करणाऱ्या गुरुप्रति आदरभावना व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना याचे महत्व कळावे; यासाठी संस्कार भारती नांदेड; दरवर्षी एका शाळेमध्ये पारंपरिक गुरु पूजन सोहळ्याचे आयोजन करते. या वर्षी दि.२२ जुलै २०२४ रोजी नांदेड संस्कार भारतीच्या वतीने गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये पारंपरिक गुरू पूजन सोहळा संपन्न झाला.

आरंभी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सौ.चारुताताई देशपांडे यांचे समवेत संस्कार भारती नांदेडच्या अध्यक्षा राधिका वाळवेकर, मार्गदर्शक तथा संरक्षक सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. दीपक कासराळीकर, कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे आणि गुरुकुलच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली देशमुख आणि सौ.पल्लवी जोशी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, नटराज पूजन, व्यास पूजन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ. मंजुषा देशपांडे यांनी सुरेल स्वरात ध्येयगीत सादर केले. त्यानंतर राधिका वाळवेकर यांनी प्रस्तावना करताना व्यासपौर्णिमा या अनिवार्य उत्सवाबाबत संस्कार भारतीची भूमिका समजावून सांगितली.

विभागप्रमुख सौ. शर्वरी सकळकळे यांनी अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षनिमित्त या वर्षात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची व उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी यांच्या परंपरेतील सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ.सौ. वैशाली गोस्वामी यांनी सूत्रसंचालन करताना संत परंपरेतील विविध पदांचे दाखले देत पारंपरिक पद्धतीने गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या गुरूजनांचे पूजन करून घेतले. निसर्गरम्य परिसरात अतीशय प्रसन्न आणि प्रासादिक वातावरणात गुरूपूजन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मुख्य व्याख्यात्या सौ. चारुता देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानासाठी गुगल, इन्स्टा यांपेक्षा प्रत्यक्ष शिक्षक आणि पुस्तकं यांच ज्ञान घेण्यासाठी असलेले महत्त्व सांगून,कलेच्या क्षेत्रात आजही प्रत्यक्ष गुरूची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.


विद्यार्थ्यांनी याच वयात प्रचंड वाचन करायला हवे असे त्या म्हणाल्या. त्यानंतर सौ. राधिका वाळवेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे पांच श्लोकांचे पठण करून घेतले.गुरुकुलच्या दोन्ही मुख्याध्यापिकांनी अध्यक्षीय समारोपांत संस्कार भारतीचा हा उपक्रम आवडल्याचे व विद्यार्थ्यांकरिता अतिशय स्तुत्य असल्याचे सांगून अशाप्रकारचे आणखी उपक्रम त्यांच्या शाळेत व्हावेत असे मनोगत व्यक्त केले. शेवटी संस्कार भारतीच्या सचिव सौ.अंजली देशमुख यांनी आभार व्यक्त केले.

व्यासपीठ शेजारी सौ. मुग्धा बोरगांवकर, सौ. अंजली कुलकर्णी, सौ. रेणू पिंपळडोहकर, सौ. अंजली देशमुख व दिव्यांग कलाकार गोदावरी जंगिलवाड या संस्कार भारती भू अलंकरण टीमने केलेले सुंदर भू-अलंकरण अतिशय लक्षवेधी होते.या कार्यक्रमासाठी विजयाताई कोदंडे, सौ. नीता माळोदे, सौ. दीपाली आवाळे, गणेश भोरे व बाल सदस्य चैतन्य माळोदे या सर्वांनी परिश्रम घेतले होते. गुरुकुल पब्लिक स्कुल चे संचालक निलेश पावडे , सौ.जयश्री पावडे तसेच व्यवस्थापन प्रमुख सुप्रसिद्ध साहित्यिका आशाताई पैठणे यांनी सहकार्य केले.

