उमरखेड| करोडी रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नागरिक सुख, सुविधेसाठी प्रशासन दरबारी खेटे मारत आहेत. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वात उमरखेड-करोडी रस्ता आर.सी.सी बांधकाम करावे यासाठी दिनांक २३ जून रोजी पैनगंगा नदीमध्ये जल समाधी आंदोलन करण्यात आले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्तीच्या पक्षाचे 40 कार्यकर्ते व गावकरी मंडळीनी घेऊन पाण्यामध्ये उतरून आंदोलन करण्यात आले. रस्त्याची दुरावस्था झाल्याने उमरखेड, करोडि येथील शेतकरी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गांवरील उमरखेड-करोडी येथील शेतकरी बांधवांची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना शेतीमध्ये पिकांची लागवड करताना व शेतीतील आलेला धान्य घरी किंवा बाजारपेठेत नेण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही रस्ता उपलब्ध नाही.

सदर भागातील नागरिकांना रुग्णालयाला येण्यासाठी सुद्धा हा मार्ग फायदेशीर असून, या रस्त्यासाठी अनेकदा शेतकरी व परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत आंदोलने केली. या आंदोलनाकडे व शेतकयांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाणे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आणि उमरखेड शहर सचिव शाम चेके यांच्या यांचा कडुन सदर रस्त्याचे तात्काळ आर.सी.सी बांधकाम करून या रस्त्यावर येणाऱ्या लेंडी, नाल्याच्या फुलाची उंची तात्काळ वाढवावी अशी मागणी करण्यात आली.



नदीत जलसमाधी आंदोलन करताना तीव्र शब्दात निषेध करत जिल्हयाच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार, युवा उपजिल्हाप्रमुख अभिजीत गंदेवार, तालुका उपप्रमुख गोपाल झाडे, शहर सचिव शाम चेके, भास्कर गंजेवार, शाखाप्रमुख बालाजी भोयर, आधी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकत्यांसह विनोद कवाने, आलीम पटेल, राहुल कानडे, अनिल कलाने, शेषराव कानडे, विकास लावरे, संजय मते, खंडू खरुसकर, लक्ष्मण साखरे, गजानन नरवाडे, शेख अदिल, बालाजी मुडे आदी शेतकरी बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान उमरखेड येथील सां.बा. विभागाचे उपअभियंता यांनी करोडी येथील लोकांना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटून तुम्ही करत असलेले आंदोलन मागे घ्यावी अशी विनंती करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि करोडी ते उमरखेड या रस्त्याचे दुरुस्ती करण्याचे आश्वासन देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम मार्गे लावण्याचा शब्द दिला. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी तातडीने रस्त्याचे काम झाले नाहीतर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहें.

