Wednesday, May 13

“डीजे नव्हे, विचारांचा जल्लोष करा!” — महापौर कविता मुळे यांचे आवाहन

नांदेड| महापुरुषांच्या जयंती उत्सवाला योग्य दिशा देत डीजे मुक्त व व्यसनमुक्त साजरीकरणाचा संदेश देणाऱ्या जयंती मंडळांचा नांदेडमध्ये सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून “उत्सवात गोंगाट नव्हे, विचारांचा वारसा जपा” असा ठाम संदेश समाजाला देण्यात आला.

मराठी नाऊ फाउंडेशन आणि समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डीजेविरहित पद्धतीने साजरी करणाऱ्या मंडळांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महापुरुषांच्या जयंती हा केवळ उत्सव नसून विचारांचा वारसा पुढे नेण्याची संधी आहे. डीजेच्या आवाजात आणि व्यसनांच्या आहारी जाऊन साजरी होणारी जयंती समाजाला योग्य दिशा देऊ शकत नाही.”

त्या पुढे म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण मानवजातीसाठी आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.”

IMG 20260321 WA0036 “डीजे नव्हे, विचारांचा जल्लोष करा!” — महापौर कविता मुळे यांचे आवाहन

कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, “डीजे व व्यसनामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असते. अशा सकारात्मक उपक्रमांमुळे समाजात चांगला संदेश जातो,” असे मत व्यक्त केले.

यावेळी २०२५ मध्ये डीजेमुक्त जयंती साजरी करणाऱ्या मंडळांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले. माता रमाई बुद्ध विहार जयंती मंडळाला प्रथम, एसटी वर्कशॉप जयंती मंडळाला द्वितीय, तर बळीरामपूर जयंती मंडळाला तृतीय क्रमांक देण्यात आला. समाजाला योग्य दिशा देणारा हा उपक्रम ‘आदर्श जयंती’ची नवी परंपरा निर्माण करणारा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!