हिमायतनगर| तालूक्यात कर्तव्यावर असलेले अनेक ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीला वेळेवर हजर राहत नसल्याने ग्राम विकासांची कामे खोळंबली आहेत. पंचायत समितीच्या कार्यालयात देखील अधिकारी व कर्मचारी ही वारंवार अनूपस्थित राहत असल्याने जनतेची कामे वेळेवर होणे कठीण झाले आहे. आता वरिष्ठ अधिकारीच कार्यालयाला दांडी मारत असल्याने त्यांचाच कित्ता इतर कर्मचारी गिरवीत आहेत. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

हिमायतनगर तालुक्यात ५३ ग्रामपंचायती आहेत. ग्रामसेवकांची संख्या तशी खुप कमी असल्याने एका ग्रामसेवकाला तीन ते दोन ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार देवून कारभार चालविण्यात येत आहे. अर्थात एक ग्रामसेवकाला त्यांच्या मागणी प्रमाणे दोन अधिक ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. ग्रामसेवक मात्र या बाबींचा फायदा उचलत आहेत. इकडच्या गांवकर्याना तिकडे असल्याचे सांगून वेळ मारून नेत आहेत.

ग्रामसेवक गावात येत नसल्याने अनेक महत्त्वपूर्ण कामे थांबलेली आहेत. पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सातत्याने गैरहजर राहत आहेत. आपल्या सोयीनुसार नांदेड व इतरत्र वास्तव्य करून कार्यालयाला येणे जाणे असल्याने उशीरा येणे व त्यानंतर लगेच निघून जाणे असा दिनक्रम कर्मचार्याचा चालू असल्याने कामांसाठी बाहेर गावाहून आलेल्या नागरीकांना रिकाम्या हातांनी परतावे लागत आहे.


आदिलाबाद ते मुंबई सिएसटी नंदिग्राम एक्स्प्रेस ही हिमायतनगर ला दुपारी पावनेतिन वाजता येते. याच रेल्वेगाडीने हे कर्मचारी निघून जातात. दुपारी तिनच्या नंतर शासकीय कार्यालये ओस पडत आहेत. वरिष्ठ अधिकारी च अपनडाऊन करीत असल्याने त्यांचा कित्ता त्यांच्या अखत्यारीत काम करणारे कर्मचारी गिरवित आहेत. या गंभीर बाबींकडे जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी तात्काळ लक्ष वेधून अधिकरी व कर्मचाऱ्यांच्या स्वैराचारास तात्काळ चाप लावावा. अशी मागणी सुजान नागरीकांतून जोर धरू लागली आहे.


