
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर (Former MLA Madhavrao Patil Javalgaonkar) यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली.


अतिवृष्टीच्या पाण्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग यांसारखी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काही घरांची पडझड झाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू भिजून खराब होऊन गेल्या आहेत.


दरम्यान, इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, गावोगावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीची माहिती मिळताच माजी आमदार जवळगावकर यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांची विचारपूस केली. तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. शासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून पीडितांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. या प्रसंगी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाहीचे आश्वासन देत, दोन दिवसांत पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात येणार असल्याचे सांगितले.






