
हिमायतनगर, अनिल मादसवार| देशात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा थेट परिणाम आता शिक्षण क्षेत्रावर दिसू लागला आहे. हिमायतनगर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत मागील तीन दिवसांपासून खिचडी शिजवली गेली नसल्याने तब्बल ६०० विद्यार्थि शालेय पोषण आहारापासून वंचित राहिले आहेत.


हिमायतनगर येथील जिल्हा परिषद शाळा दोन सत्रांमध्ये चालवली जात असून, विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या पोषणासाठी शालेय खिचडी हा महत्त्वाचा आधार आहे. मात्र गॅस उपलब्ध होत नसल्याने स्वयंपाक पूर्णपणे ठप्प झाला आहे. या संदर्भात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाळजकर यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, “गॅस बुकिंग होत नसल्यामुळे खिचडी शिजवता आलेली नाही,” अशी माहिती देण्यात आली.

दरम्यान, तीन दिवसांपासून पोषण आहार बंद असल्यामुळे विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून विद्यार्थ्यांना पोषण आहार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.


शालेय पोषण योजनेवरच प्रश्नचिन्ह..?
सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेची गैस उपलब्ध होत नसल्याने अंमलबजावणीच ढासळल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असून, संबंधित विभागाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.



