योगायोगाने लाभलेले शक्तिपीठ दर्शन आणि भोलेबाबाच्या यात्रेचा सेवाभावी मंत्र
आजच्या दिवशी अमृतसरमध्ये पोहोचणे एवढेच उद्दिष्ट होते, त्यामुळे सर्वांना निवांत उठण्याच्या सूचना रात्रीच दिल्या होत्या. तरीही काही जण लवकर उठून पुन्हा एकदा रघुनाथ मंदिराचे दर्शन घेऊन आले.साडे नऊच्या सुमारास प्रत्येकाने ₹५० भरून कुछवाणी चौकात थांबलेल्या मोठ्या बसेसपर्यंत पोहोचलो. तिथे श्री अमरनाथजी लंगरचे पदाधिकारी आमच्या वाटेकडेच पाहत होते. त्यांनी प्रेमाने आग्रह करून आम्हाला लंगरमध्ये नाश्तासाठी नेले. खरेतर नाश्ता म्हणण्यापेक्षा भरपेट गरमागरम जेवणच मिळाले

चिची माता शक्तिपीठ दर्शन
दोन्ही बसेस अमृतसरकडे निघाल्या. कोणतेही विशेष साईटसीन नसल्यामुळे ज्ञानोबा जोगदंड यांना विचारल्यावर त्यांनी “चिची माता मंदिर” सुचवले. हे मंदिर जम्मूपासून ३३ किमी अंतरावर सांबा जिल्ह्यात वसलेले असून एक प्राचीन शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. विनंती करून बसचालकांनी मंदिराजवळ गाड्या थांबवल्या आणि आम्हाला या पवित्र स्थळाचे दर्शन मिळाले.

चिची माता मंदिराचा पौराणिक इतिहास
देवी सतीने दक्ष यज्ञात आत्मदहन केल्यानंतर, तिचे शरीर महादेवाने पृथ्वीवर घेऊन तांडव केले. हे पाहून विश्वाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीचे शरीर ५१ भागांमध्ये विभागले, जे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्याच ठिकाणी शक्तिपीठे उदयास आली.असे मानले जाते की, चिची माता मंदिराच्या जागी सतीची करंगळी पडली होती. येथे देवी दुर्गेचा एक अवतार असून, तिच्या बाजूला भगवान शिवाचीही मूर्ती आहे. नवरात्रीच्या काळात येथे मोठा मेला व ध्वजारोहण सोहळा पार पडतो, ज्यात हजारो भक्त सहभागी होतात. या मंदिराचे आकस्मिक दर्शन झाल्याने सर्व भाविक भारावले आणि कृतज्ञता व्यक्त केली.


बस प्रवासात हास्य, भजन आणि एकात्मतेचा संगम
पुढील प्रवासात रामेश्वर वाघमारे यांनी गेम्सचे आयोजन करून रोख बक्षिसे दिली. “वऱ्हाड निघालंय लंडनला” या प्रसिद्ध एकपात्री नाटकाचा काही भाग रूपाली शैलेंद्र वडजकर यांनी अप्रतिम पद्धतीने सादर करून सर्वांना हसवले. राजेशसिंह ठाकूर यांनी बसमधून सामूहिक नामस्मरण घडवून आणले.सुभाष देवकत्ते यांनी एक बस कॅप्टन म्हणून अत्यंत जबाबदारीने हाताळली.लखीमपूर खिरी ओलांडून पंजाबची सीमा लागली. दुपारी ३ च्या सुमारास पुन्हा एका लंगरमध्ये गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे लंगरमधील डिस्को भजनांच्या सुरांवर अनेकांनी आनंदाने नाचत आपला थकवा दूर केला!

अमृतसरचे स्वागत आणि रात्रीची व्यवस्था
संध्याकाळी अमृतसरमध्ये पोहोचल्यावर “हॉटेल नय्यर रेजिन्सी” आणि “नय्यर इन” या दोन्ही ठिकाणी एसी रूम्स, स्वच्छता आणि प्रशस्त व्यवस्था पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला.काहीजण आश्चर्याने म्हणाले,“इतकी चांगली व्यवस्था… एवढ्या कमी टूर कॉस्टमध्ये? कसं जमतं?”मी हसत उत्तर दिलं, “ना नफा, ना तोटा… ही भोलेबाबाची यात्रा आहे, त्याच्या आशीर्वादानेच हे शक्य होतं.” रात्रीच्या जेवणासाठी कोणीही प्रयोजक नसल्याने स्नेहलता जायस्वाल, सुरेखा राहतीकर आणि द्वारकादास अग्रवाल,अनिरुद्ध रामेश्वर वाघमारे यांनी नास्ता साठी पैसे दिले होते. नास्ता ऐवजी त्यांच्याच संमतीने राजेशसिंह ठाकूर यांनी गरमागरम, रुचकर भोजनाची व्यवस्था केली.जेवणानंतर सर्वांनी आपल्या प्रशस्त एसी रूममध्ये झोपण्याला प्राधान्य दिलं. (क्रमशः)

