Wednesday, May 13

Death freed me, life tormented me : मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…

बिलोली, गोविंद मुंडकर| “मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते.” या कविवर्य सुरेश भट यांच्या काळजाला भिडणाऱ्या पंक्ती आता बिलोलीतील सामाजिक परिस्थितीचे जणू भाष्य ठरत आहेत. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी संदर्भातील प्रलंबित प्रश्नी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कुंडलवाडी येथील स्मशानभूमीची झालेली दुरवस्था यामुळे संतप्त भावना उफाळून येत आहेत.

बिलोली येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीबाबत महिन्यांपासून प्रशासकीय दुर्लक्ष सुरु आहे. संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा व अहवाल सादर करूनही पुढील कारवाईस विलंब लावला गेला. रामराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शेकडो नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली होती. पाटील, देशमुख, पटणे, मुंडकर, इळेगावे, बोंगाळे कुटुंबातील नागरिकांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनावर प्रशासनाने मात्र मूग गिळून गप्प बसणेच पसंत केले.

कुंडलवाडी येथील स्मशानभूमीतील झाडाझुडपांनी अतिक्रमण केल्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी येणाऱ्या नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळाने यासंबंधी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने दिली, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.

अखेर “प्रशासन गप्प – आम्ही पुढे!” या भूमिकेतून गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेत स्वतः स्मशानभूमी परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली. झाडेझुडपे काढण्याचे काम स्थानिक सहभागातून यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले. यामध्ये संस्थेचे सचिव श्री बी. पी. नरोड यांनी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाचे आणि सामाजिक जाणिवेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

सद्या परिस्थितीत, “स्मशानभूमीतील शवांप्रमाणेच प्रशासनाची संवेदनाही मृत झाली आहे का?” असा उद्विग्न प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. मृत व्यक्तींच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सोयीसाठी स्मशानभूमीची योग्य व्यवस्थापन ही केवळ सामाजिक नव्हे तर नैतिक जबाबदारी असल्याची भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!