किनवट,परमेश्वर पेशवे। विना परवाना खताची विक्री केल्या प्रकरणी कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली असून, 14 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत खताचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.

तेलंगाणा राज्यातून महाराष्ट्रातील सिमावर्ती भागातील गावात विना बिल खताची विक्री करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला मिळताच दि. 22 मे गुरुवार रोजी शिवणी परिसरात सापळा रचत टि एस यु इ 6422 क्रमाकांचा टेम्पो श्री कृष्ण मंदिरा जवळ पकडून या गाडीची चौकशी केली असता विना बिल खताची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. सदरील गाडी ताब्यात घेऊन कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी इस्लापुर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या एका कर्मचाऱ्यांच्या फिर्यादी वरून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील टेम्पोची किंमत 14 लाख व खताची किंमत 64 हजार 422 रु. असे मिळून 14 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तेलंगाणा राज्यातून दरवर्षी विना परवाना विनाबिले खते घेऊन येऊन ईस्लापूर, शिवणी परिसरातील अतिदुर्गम भागातील वाडी, तांडे, यासह विविध गावात दरवर्षी खते विकण्याचा गोरख धंदा जोरात सुरू असून या बाबत गेल्या वर्षी देखील मोठी कारवाई दि. 30 मे 2024 रोजी करण्यात आली होती.



या कारवाईत 30 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हा सर्व प्रकार या भागांमध्ये दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर घडत असताना कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे लक्ष का देत नाही असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन कृषी विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांना या बाबत ताकीत दिली पाहिजे अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.


