Umarkheed ; उमरखेड तालुक्यात तीन महिन्याचे रेशन वितरणामध्ये सावळा गोंधळ….

उमरखेड l शासन निर्णयानुसार पुढील दोन महिन्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास गोर गरीब जनता अन्नधान्यापासून वंचित राहू नये याकरिता सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारे माहे जून मध्ये जून जुलै ऑगस्ट अशा तीन महिन्याचे रेशन वाटप करणे सुरू आहे परंतु उमरखेड शहरासह तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या शासनाच्या निर्णयाला पुरवठा विभाग रास्त भाव दुकानदार न जुमानता सावळा गोंधळ करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.


गोरगरीब जनतेसाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना मधील मोफत धान्य पुरवठा ही एक महत्वपूर्ण योजना असून उमरखेड शहरासह तालुक्यात याची पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. लाभार्थी नागरिकांना रास्त भाव दुकानात रेशन मिळण्यासाठी नाहक त्रास होत आहे.

एरवी एक महिन्याचे धान्य वाटप करण्याकरिता रास्त भाव दुकानदार संपूर्ण महिना घालतात आणि या जून महिन्यामध्ये एकूण तीन महिन्याचे धान्य वाटप करावयाचे आहे सध्या तरी जून महिन्याचेच धान्य वाटप अर्धवट स्वरूपात आहे तांदूळ आलेला आहे गहू येणे बाकी आहे अशी उत्तरे लाभार्थ्यांना ऐकावयास मिळत आहे अशातच उमरखेड तालुक्यातील लोहरा खुर्द येथील रास्त भाव दुकानदाराने लाभार्थ्यांना तीन महिन्याच्या धान्यावर त्यांचा अंगठा घेऊन दोन महिन्याचे धान्य वाटप करण्यात येत असल्याचा आरोप तहसीलदार उमरखेड यांना देण्यात आलेल्या निवेदनात लोहरा खुर्द येथील ग्रामस्थांनी केला आहे.


याबाबतीत लोहरा खुर्द येथील जागरूक नागरिक विकास दिलीप विनायते यांनी संबंधित रास्त भाव दुकानदारास विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवी ची
उत्तरे दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. दोन महिन्यांचे धान्य वाटप करून तीन महिन्याच्या धान्यवर अंगठा घेत असल्याची तक्रार प्राप्त झाली असून प्रकरणाची कशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे उमरखेड तहसीलचे पुरवठा निरीक्षक अमोल महाजन यांनी म्हटले आहे.

याबाबतीत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष घालून गोरगरीब जनतेच्या मुखातला घास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची कार्यवाही करावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. त्वरित चौकशी होऊन कार्यवाही न झाल्यास उपोषणास बसत असल्याचा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे यावेळी विकास दिलीप विनायते यांचे सह लोरा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



