बिलोली, गोविंद मुंडकर| शेतातील तंबाखूच्या पानांना धुवा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या भट्टीत पडून बिलोली तालुक्यातील सावळी येथील एका सव्वीस वर्षीय तरुण शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २६ फेब्रुवारी च्या रात्री बारा ते एक वाजताच्या सुमारास घडली.गावातील एका होतकरू तरूण मुलाचा अशा प्रकारे झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

बिलोली शहरापासून जवळच असलेल्या तालुक्यातील मौजे सावळी येथील राहूल सुरेश देवकरे हा तरुण पुर्वी पुणे येथे कंपनीत कामास होता. काही वर्षांपासून राहुल हा आपली उपजीविका चालविण्यासाठी गावात दुसऱ्यांची शेती खंडाने करून आपल्या संसाराचा गाडा हाकायचा यंदाही सुरेश याने खंडाने केलेल्या शेतात तंबाखू या पिकाची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी शेतातील तंबाखूच्या पानांची तोडणी करून तंबाखूच्या पानांना धुवा देण्यासाठी शेतातच भट्टी उभारली होती. गत दोन दिवसांपासून शेतातील भट्टीमध्ये तंबाखूची पाने बांधून पानांना धुवा देण्यात येत होते.

नेहमी प्रमाणे पानांना धुवा देण्यासाठी राहुल देवकरे हा दि. २६ फेब्रुवारी रोजी शेतातच थांबला होता. रात्री बारा ते एक वाजताच्या सुमारास राहुल हा भट्टीमध्ये जळतन टाकण्यासाठी गेला होता भट्टीत जळतन टाकताना तोल गेल्याने राहुल देवकरे याचा भट्टीत भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी बिलोली पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून घटनेची नोंद केली आहे.


राहुल देवकरे याच्या पार्थिव देहाचे शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयत राहुल सुरेश देवकरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. राहुल हा घरातील एकुलता कमावणारा असल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून राहुल देवकरे याच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा सावळीच्या ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


