
नांदेड | लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, शिक्षणतज्ञ आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे २ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.


ही श्रद्धांजली सभा शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ४.३० वाजता लातूर येथील दयानंद सभागृहात होणार असून, समस्त लातूरकरांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

डॉ. वाघमारे यांनी साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ७५ पेक्षा अधिक पुस्तके लिहिली असून, ज्ञानाच्या बळावर सर्वोच्च पद गाठणारे ते खरे ‘ज्ञानर्षी’ मानले जात. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले तसेच निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी चळवळीवर सखोल संशोधन केले.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ चे संस्थापक व पहिले कुलगुरू म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली. तसेच लातूरमधील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विकासातही त्यांचा मोठा वाटा होता.

राजकारणातही त्यांनी सक्रिय सहभाग घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राज्यसभेवर खासदार म्हणून काम केले. मराठवाड्याच्या विकासासंदर्भात अनेक प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण आणि राजकारण यांना दिशा देणारा मार्गदर्शक दुवा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
या श्रद्धांजली सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, डॉ. दिगंबर नेटके, डॉ. विनायक कलमे, प्राचार्य संजय वाघमारे, प्रा. सुधीर साळुंखे, प्रा. डॉ. विनोद चव्हाण, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, विवेक सौताडेकर आदींनी केले आहे.



