
मुंबई| राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


17 मार्च रोजी राज्यातील दक्षिण भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता अधिक असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः तेलंगणा व कर्नाटक सीमेलगतच्या भागांमध्ये हवामानाचा अधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.

18 ते 20 मार्च दरम्यान या वादळी पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढण्याची शक्यता असून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. 21 मार्चपासून हवामान स्थिर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.


दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत. बाजार समित्यांमध्ये आणलेले धान्य व कृषीमाल पावसापासून सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी.

तसेच मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा विद्युत खांब व ट्रान्सफॉर्मरजवळ उभे राहणे टाळावे, असेही प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.



