हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे हिमायतनगर तालुक्यातील शेती पिके मोठ्या प्रमाणावर पाण्यात राहून सडून गेली आहेत. उरलेसुरले पिकेही परतीच्या पावसामुळे अखंड पाण्यात राहून कोंब फुटू लागले (The crisis of Himayatnagar farmers is deep) आहेत. हे विदारक दृश्य पाहून शेतकरी राजा हाताश झाला असून, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या सुलतानी संकटामुळे हिरावून घेतला आहे.


अत्यंत गंभीर संकट शेतकऱ्यांवर कोसळलेले असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. “शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असून, आमची अवस्था मरणाच्या दारावर आणली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहे.


यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी, एकम्बा, सिरपली, डोलारी, पळसपूर, घारापूर, कामारी, मंगरूळ, बोरगडी, कोठा, हिमायतनगर, सिबदरा, आंदेगाव, पारडी यासह नाल्यालगतच्या लहानमोठ्या गावांतील शेतकऱ्यांकडून शासनाला ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे.



शेतकऱ्यांनी शासनासमोर प्रति हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत जाहीर करावी, ओला दुष्काळ घोषित करून कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. तसेच पंचनाम्याच्या निकषांमध्ये वेळ दवडू नये, तर शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे.



